Tuesday, 5 September 2017

              ऐसी अक्षरे : संत साहित्य परिचय विशेषांक - जुलै ऑगस्ट २०१७.
       बेलवलकर हे नाव १९६०च्या दशकापासून पुण्याच्या बांधकाम व्यवसाय क्षेत्रात प्रसिद्ध आहे.
प्रत्येक घर शुभंकर, हे ब्रीदवाक्य मनात कायम करीत एकामागोमाग एक असे अनेक लहान मोठे गृहप्रकल्प गेल्या पाच दशकांत बेलवलकर गृह उद्योगाने बांधून पूर्ण केले. आपल्या गृह प्रकल्पातील प्रत्येक कुटुंबाशी आपले नाते कायम मैत्रीपूर्ण रहावे या उद्देशाने कै. शरदचंद्र बेलवलकर यांनी ऐसी अक्षरी हा अनोखा साहित्यिक उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला आता चौदा वर्षे पूर्ण झाली. माझे सद् भाग्य म्हणजे ऐसी अक्षरेच्या संपादनाची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली. मला माहीत नाही मी ही जबाबदारी कितपत नीट सांभाळू शकतोय.  हे माझ्या अत्यंत आवडीचे काम करण्यात मला अतिशय आनंद मिळतो.
        ऐसी अक्षरेचा संत साहित्य परिचय विशेषांक नुकताच प्रसिद्ध झाला आहे. हा अंक विनामूल्य आहे. वाचकांना अंक बेलवलकर हौसिंग कंपनीच्या एरंडवणे-पुणे येथील निर्मिती एमिनंस, मेहेंदळे गॅरेजजवळच्या व्हेज अभिषेक वरील कार्यालयात रविवार आणि सुटीचा दिवस सोडून सकाळी ११.००  ते सायंकाळी ६.०० मिळू शकेल.

पद्मनाभ हिंगे
संपादक.
 


Monday, 17 July 2017

शंकासुर आणि माझ्या संयमाची कसौटी ....

                          शंकासूर आणि माझ्या संयमाची कसौटी .... 

        नेहमीच्या सवयीप्रमाणे प्रभातफेरीसाठी म्हणजे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलो.  मुख्य दार ओढलं आणि कुलुप लावलं. परत येतांना दूध वगैरे काही आणायचं नव्हतं म्हणून सोबत  पैश्याचे पाकीट घेतले नाही, कशाला उगाच हवंय म्हणून ! पैश्याच्या  पाकिटाची आठवण येताच मनात का कुणास ठाऊक; पण एकदम एक शंका आली. काल आपण दुकानात गेलो, पाकीट काउंटरवर ठेवल्याचे आठवले. दुकानदाराला कार्ड दिले, पावती झाली, दोन्ही पिशव्या घेतल्या. नंतर आपण काउंटरवर ठेवलेले पाकीट उचलून खिश्यात नक्की  ठेवले ना ? अर्ध्या जिन्यातून माघारी वळावे असे वाटत असतांनाच पावले मात्र आपोआप जिना उतरून रस्ता चालू लागली. पाकिटाविषयीची ही शंका मात्र सतत पाठलाग करु लागली. असेल, ठेवले असेल रोजच्या ऑफिस ब्यागेत. काल पावसामुळे पाकीट, घड्याळ, मोबाईल भिजू नये म्हणून सारं ब्यागेत ठेवल्याचे पक्के आठवत होते. बायकोलाही सुट्टे पैसे दिल्याचे आठवत होते. त्यावेळी ब्यागेतूनच पाकीट काढल्याचे आठवत होते. नंतर दुकानात जाण्यासाठी बाहेर पडलो, तेंव्हा सकाळी फिरायला जायचीच ट्रैक पैंट घातली होती. तीच आता फिरायला जातांना घातली आहे. मग आता खिश्यात पाकीट तर नाही. दुसऱ्या दाराला लटकवलेल्या प्यान्टच्या खिश्यात ठेवले असेल का ? आपण काल खरंच का पाकीट नीट काढून ठेवले होते ? विसरलो तर नाही ना दुकानात !!
       धस्स झालं.
       मी माझ्या याच विचारांच्या तन्द्रीत चालत होतो. जिना उतरता उतरताच मागे फिरून, दार उघडून पहायला हवे होते. बायको काय बोलते आहे याकडे माझे लक्षच नव्हते. नशीब मनात चाललेली ही खळबळ तिच्या नजरेस आली नाही. उजाडलेले नसल्यामुळे आणि नेहमीच दोन पावले चालताना तिच्यापुढे असल्याने तिला काही  समजलं नाही. बरं मनातली ही खळबळ बायकोला सांगायची पंचाईत. मनातल्या मनातच तिचा अनेक भावनांनी युक्त असलेला चेहरा दिसू लागला असता. तिच्या तोंडून कोण कोणते  शब्द बाहेर येतील, ते काही सांगणे अवघड झाले असते.
" अहो किती वेंधळे आहात तुम्ही ? किती पैसे होते पाकिटात ?"
" नशीब फार नव्हते गं, असतील हजार एक रुपये... "
" अहो पण तुम्ही असे कसे विसरलात ? मी विसरले असते तर किती बोलला असता तुम्ही ? अक्कलच नाही, (माझ्याकडे बघत हे शब्द तिने असे काही ठसक्यात उच्चारले असते की.... अप्रत्यक्ष मलाच दूषणे द्यायची घेतली जाणारी संधी, ती  कशाला वाया जाऊ द्यायची, असा साधा सरळ पण मुत्सद्दी डाव तिने साधला असता.  ती का सोडेल म्हणा अशी आयतीच चालून आलेली संधी ?!!) पैश्याची किंमतच नाही, मी कष्टाने कमवून आणायचे आणि तुला तर याची थोडीशीसुद्धा जाणीव नसावी...." " आता ते दुकान उघडणार केंव्हा ? तुम्ही विचारणार केंव्हा ? आणि तो सापडलं असेल तर देणार का परत ? सतराशेसाठ चौकश्या करेल....  मी परवा नुसते विचारले की भिशीतल्या मैत्रिणींच्या बरोबर ट्रीपला जाऊ का ? तर केवढे लेक्चर ऐकवलेत मला, बाई बाई !!"
माझं नशीब, अजून तरी काही बोललो नव्हतो हिच्याशी याबाबत. नाहीतर पाकीट मरू दे, पण प्रश्न आवर, असं झालं असतं.
एक तर पाकीट दुकानात विसरलेले असेल की काय या शंकेने मनात घर केलेले. त्यात हजारेक रुपयेच असले  तरी पाकिटात डेबिट कार्ड-(पिन नंबर चा कागद पाकिटात नव्हता ना चुकून राहिलेला ! नाही, तो लगेच कागद फाडून टाकला होता...!) पॅनकार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसेंस, माझे नुकतेच काढलेले पासपोर्ट साईझ दहा पंधरा फोटोज़, असा साराच ऐवज ... अरे देवा......कोणा हुशार चोरट्याच्या हाती लागले नसेल ना ! नाहीतर ते Whats app वर अधून मधून मेसेजेस येतात--अमुक अमुक करू नका, तुमची व्यक्तिगत माहिती मिळवून त्याचा बेकायदेशीर वापर केला जाऊ शकतो !!! बाप रे........
       अर्धवट मागे फिरायचे म्हणजे बायकोच्या शंभर प्रश्नांना तोंड द्यावे लागणार. निर्विकार चेहरा ठेवून मनातल्या मनात मी स्वत:ला सकाळी सकाळी शिव्या द्यायला लागलो. 'मूर्ख माणसा, कसला बावळट आहेस तू ! साधं पाकीट जपता येत नाही. झालं, तुमचं आता तुमचं वय झालं. हरी हरी करायचे दिवस आले. आता बसा घरी. अक्कल नाही, अन् म्हणे पगार वाढवा, बोनस द्या आणि वर प्रमोशन करा. लायकी तरी आहे का रे तुझी बिनडोका ?' मनात एवढी खळबळ उडाली होती पण अत्यंत कौशल्याने हिच्या समोर माझा निर्विकार-- कुठे काय ? काहीच झाले नाही, असा बथ्थड चेहरा ठेवणं मला जमत असल्याचे माझ्या लक्षात आले होते. मी स्वतःवर याही संभ्रमित अवस्थेत खुश झालो होतो. मी नेहमी सर्वांना अगदी आवर्जून सांगत असतो की बाबांनो भरपूर वाचन करा. पण नवरोबाचा चेहरा वाचून क्षणार्धात त्याच्या डोक्यात काय चालले आहे हे ओळखू शकणाऱ्या माझ्या बायकोचे हे  कौशल्य अफलातून आहे याचा मी अनेक वेळा चांगलाच अनुभव घेतलाय....  विशेषकरून एखाद्या लग्नसमारंभात स्वत:च्या नटण्यामुरडण्याकड़े लक्ष द्यायचे-मिरवायचे की नवरा नेमका कुठे बघतोय, कुणाशी बोलायचा प्रयत्न करतोय याकडे हिने लक्ष द्यायचे ? .. आरश्यासमोर उभं राहून जरा जास्त क्रीम किंवा पावडर लावतांना दिसलो की चुकून हिच्याकडे लक्ष जावं आणि हीनं म्हणावं, " हूं चालू द्या चालू दया, नटा..." असा उपहास करावा.... कल्पना करा, आज मात्र मी किती कौशल्याने मनातला गोंधळ हिच्यापासून लपवून ठेवलाय. माझं मलाच कौतुक वाटत होतं.
       कधी एकदा घरी पोहोचतोय असे झाले. भरा भरा पायही उचलत नाहीत राणीसरकार. आता काय तर म्हणे, " दोन चकरा मारूयात नानानानी पार्कात ! " तोंड वळवून ओठातल्या ओठातच पुटपुटलो. " काय म्हणालात ?" "अं...कुठं काय ?" कसाबसा उत्तरलो. चरफडण्यापलीकडे काय करू शकत होतो मी ? आपला विसराळूपणा की गाढवपणा, मूर्खपणा की बिनडोकपणा, nonsenseपणा की बेजबाबदारपणा यावर मनातल्या मनात चर्चा किंवा वितंडवाद करत बसायला कुठे काही सुचत होते ?
       "जरा पाच मिन्टे बसा बाकावर !" हिची ऑर्डर.. निर्विकार चेहरा ठेवून आतल्या आत चरफडलो. बसलो.
       "आज डब्याला काय भाजी करू ?"
       "कुठलीही कर ".. जमेल तितक्या शांतपणे मी उद्गारलो.
       "काय त्याच त्याच भाज्या करायच्या मेलं ... काल भेंडी झाली. भरल्या वांग्याची करायची तर वेळ लागेल. चार भेंड्या आहेत कालच्या, त्याच करते. चालेल ना ?" असं तिनं विचारलं खरं, पण तिचा निर्णय आधीच झाला होता. 'बरं आता निघू या का' असं विचारणं म्हणजे, ' आ बैल मुझे मार !!!! ' इथं हृदय धडधडत होतं धडाधडा.
रक्तदाब वाढतोय की काय असे भास होऊ लागले. पण एखाद्या कसबी अभिनेत्याच्या कौशल्याने चेहरा निर्विकार ठेवण्यात मला जमलं होतं...आता इतक्या वर्षांचा बायकोसमोर थंड डोक्याने वावरण्याचा अनुभव कामी आला होता. थोडी जरी चेहऱ्यावर खळबळ दिसली असती ना, तरी तिने झटक्यात शंभर प्रश्नांची प्रश्नपत्रिका ठेवली असती. आणि डोळ्यात असंख्य छड्या मारायला उतावीळ झाल्या असत्या तिच्या बोचऱ्या नजरेतून. Experienced husband असल्याचे मला कोण कौतुक वाटले...क्षणभरच. तीसुद्धा Experienced wife आहेच की !
       'अगं चल लवकर माझी आई !!! Sorry माझ्या मुलांची आई. ' मी मनातल्या मनात उत्तरलो आणि चुकीची दुरुस्तीही केली. तिने मात्र तिचा वेळ व्यवस्थित घेतलाच. माझं नशीब थोर. वाटेत कोणी हिला भेटले नाही, गप्पा मारायला. इथे माझ्या डोक्यातला शंकासूर अक्राळविक्राळ रूप धारण करू लागला होता.
       आलो बुवा एकदाचा घराजवळ ! हुश्श... नेहमीच्या संथपणानेच जिना चढून वर आलो. झपकन कुलुप उघडलं, तडक बेडरूम मधे गेलो. दारावर लटकवलेल्या  पैंटीचा खिसा चाचपला, 'थॅंक गॉड'... पाकीट होतं. सारं टेंशन गेलं. चेहरा फुलला.....
       " का हो सापडलं का ? काय हवं होतं ते ?" .... आणि माझ्या संयम कौशल्याच्या कौतुकाचा फुगा फुस्स झाला...

पद्मनाभ हिंगे, पुणे.
१८ जुलै २०१७
 

Friday, 23 June 2017

ऐसी अक्षरे

                                      
                            ऐसी अक्षरेचा वृत्तपत्रीय साहित्य विशेषांक


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते 
 ऐसी अक्षरेचा वृत्तपत्रीय साहित्य विशेषांक नुकताच प्रकाशित झाला
  
ऐसी अक्षरेच्या या वृत्तपत्रीय साहित्य विशेषांकाच्या 'आमचे दोन शब्द' या संपादकीय लेखामधील काही भाग... 

                                            
                                            खिंचो न कमानको न तलवार निकालो | 
                                            जब तोप मुक़ाबिल है तो अखबार निकालो || 

     शाळेमध्ये असताना घरी तरुण भारत, मराठा, केसरी बरोबरच कधी मार्मिक यायचा. मार्मिकमधल्या मोठ्या मिश्किल शब्दातल्या अशा या दोन ओळी आवडायच्या. त्या नेहमी वाचल्या जायच्या, त्याही त्या शायरीच्या लहेजातच. अगदी आपोआपच त्यात आवेशही यायचा. त्याचा अर्थ त्यावेळी कळत नव्हता. वर्तमानपत्रे वाचायची. त्यातल्या ठळक बातम्यांचे मथळे वाचायचे. त्या वयाला साजेशा, भावणाऱ्या, स्वारस्य वाटणाऱ्या बातम्या वाचायच्या. व्यंगचित्रे पाहायची. ह्या रोजच्या नित्यनेमाच्या गोष्टी होत्या. काही घरांमधून वडीलधारी व्यक्ती मुलांकडून वर्तमानपत्रे वाचून घ्यायची. उद्देश अनेक असायचे. मुलांना वाचनाची सवय होणे, मोठ्यांदा वाचताना शब्दोच्चार सुस्पष्ट करता येणे. दैनंदिन ताज्या घडामोडींची माहिती होणे.  नव्या शब्दांची ओळख होणे. नव्या विषयांची माहिती मिळणे. असे एक ना अनेक गोष्टींची माहिती मिळवणे हा एक संस्कारच म्हणायचा अशी पद्धत होती. शाळेच्या अभ्यासाबरोबरच अवांतर वाचन म्हणून पुस्तकवाचन आणि वर्तमानपत्रवाचन या महत्वाच्या बाबी असायच्या. काही विशेष बातम्यांची, माहितीची कात्रणे काढून वहीत चिकटविणे हाही सुटीतला उद्योग असायचा. मी १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धाचे वेळी आलेल्या भारतीय जवानांच्या शौर्यकथांची वर्तमानपत्रातील कात्रणे कापून खूप वर्षे जपून ठेवली होती. यात परमवीरचक्र विजेता 'अब्दुल हमीद 'च्या शौर्याच्या बातमीचे कात्रण कित्येक वर्षे मी जपून ठेवले होते. याचबरोबर अपोलो ८ नंतरच्या चांद्रयान मोहिमेतील अनेक कात्रणे मी जपून ठेवली होती.
     लहानपणापासूनच सकाळी वर्तमानपत्र वाचण्याची सवय मला लागलेली. एकदा, 'आजचा अग्रलेख काय आहे रे ?' असा प्रश्न माझ्या मामाने मला विचारला होता. अग्रलेख म्हणजे काय आणि कोणता असतो याची मला माहिती नव्हती. पण मोठी माणसे अग्रलेख वाचण्याला फार महत्व द्यायची हे त्यावेळी लक्षात आले. 'अरेच्चा तुम्ही अग्रलेख वाचत नाही ' असा मामाचा सूर होता आणि त्याचबरोबर अग्रलेख वाचायला हवा अशी त्याने शब्दांत न सांगता दिलेली सूचना होती. पुढे हळूहळू अग्रलेखाचे महत्व कळू लागले आणि मार्मिक मधल्या वर दिलेल्या शायरीतल्या दोन्ही ओळींचे महत्व उमगू लागले. 'बातम्या शिळ्या झाल्या ' असे म्हटले जाते ते कळू लागल्यावर अग्रलेखाचे मात्र तसेच असते असे नाही, हेही कळू लागले कारण ते एखाद्या घटनेवरचे महत्वाचे भाष्य असते. वर्तमानपत्राचे आयुष्य त्या त्या दिवसापुरतेच. पुढे त्याची रद्दी. अशीच एकूण भावना. ठराविक साच्याच्या शिळ्या होणाऱ्या बातम्या सोडल्या तर वर्तमानपत्रांनी उत्तम ललित वैचारिक साहित्यसुद्धा वाचकांसमोर नेहमीच ठेवले आहे. असंख्य वाचक वर्तमानपत्रातल्या बातम्यांची अथवा त्यांना आवडलेल्या लेखांची कात्रणे कापून अतिशय व्यवस्थित जपून ठेवतात.... ..                                                                                   
                           ऐसी अक्षरे च्या वृत्तपत्रीय साहित्य विशेषांकाच्या संपादकीयातून.. ..

  
ऐसी अक्षरे या नियतकालिकाविषयी थोडेसे.... 


     ऐसी अक्षरे या नियतकालिकास येत्या ऑगस्टमध्ये  १४ वर्षे पूर्ण होत आहेत. मराठीमधल्या दिग्गज लेखकांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले उत्तम निवडक पूर्वप्रकाशित साहित्य ऐसी अक्षरेच्या अंकात पुन्हा प्रकाशित केले जाते. ऐसी अक्षरेचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे ऐसी अक्षरेचा प्रत्येक अंक विनामूल्य असतो.
     गेल्या १४ वर्षात ऐसी अक्षरेचे अनेक विशेषांक प्रकाशित झाले. कौशल इनामदार, सुबोध भावे, गिरीश कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, जितेंद्र जोशी या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलावंतांनी काही अंकांचे अतिथी संपादक म्हणून आपला सहभाग नोंदवला 
     ऐसी  अक्षरेचे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे गौरव विशेषांक, डॉ. जयंत नारळीकर सन्मान विशेषांक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पंचविसावी जयंती आणि  जागतिक महिला दिन याचे औचित्य साधून प्रकाशित झालेला आत्मोद्धार विशेषांक, साहित्य आणि चित्रपट माध्यमांतर विशेषांक असेही काही उत्तम अंक प्रकाशित झाले आणि रसिक वाचकांच्या ते पसंतीस उतरले.. 

  
   
 ऐसी अक्षरे हवा असल्यास आपण पुढील कार्यालयात संपर्क साधून अंक घेऊन जावा. अंक विनामूल्यच आहे.         
ऐसी  अक्षरे, द्वारा, बेलवलकर हाउसिंग कंपनी, निर्मिती एमिनन्स, चौथा मजला, ११७५/, एरंडवन,         मेहेंदळे गॅरेज जवळ, व्हेज अभिषेक हॉटेलच्या वर, पुणे . दूरभाष... ०२०२५४५१६१०/२५४५६२००

वेबसाईट : www.belvalkarhousing.com 
अंकाची सॉफ्ट कॉपी हवी असल्यास, pphinge@belvalkarhousing.com वर मेल आयडी पाठवावा. 

पद्मनाभ हिंगे,
संपादक,
ऐसी अक्षरे

 

Thursday, 22 June 2017

Aisee Akshare...

मुख़्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते 
ऐसी अक्षरेच्या विशेषांकाचे प्रकाशन.

मंगळवार २0 जूनचा दिवस अविस्मरणीय होता.  ऐसी अक्षरे चा मे / जून २०१७ चा अंक वृत्तपत्रीय साहित्यावर करू या, असे समीर बेलवलकर यांनी सुचवले. आणि हा वेगळा विषयच अशा साहित्याच्या शोधमार्गावर घेऊन निघाला.                               अंक कसा असावा, याविषयी ह्या विषयातल्या अनुभवी व्यक्तिंशी संपर्क साधला. लोकसत्तेचे श्री. मुकुंद संगोराम, सकाळचे श्री. मल्हार अरणकल्ले, महाराष्ट्र टाइम्सचे श्री. श्रीपाद ब्रह्मे यांचे बरोबर चर्चा केली. ज्येष्ठ पत्रकार श्री. ह. मो.मराठे, सकाळचे श्री. विजय सबनीस यांची मदत झाली.
अंकाने आकार घेतला आणि या अंकाचे एका मोठया व्यक्तीच्या हस्ते प्रकाशन करायचे ठरले.
राजेश दामले यांनी नेहमीच्या उत्साहाने कामास सुरुवात केली.
पुण्याच्या आमदार मा. सौ.मेधाताई कुलकर्णी यांनी पाठपुरावा करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेतली.

मंत्रालयात मुख्यमंत्री साहेबांच्या दालनांत गेलो तर तिथे सारीच मोठमोठी मंडळी देवेंद्रजी यांच्या भेटीसाठी तिष्ठत बसलेली होती.
मंत्री, खासदार, आमदार, यांच्याबरोबर थांबलेल्या अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना पाहिल्यावर आपल्याला प्रकाशनासाठी वेळ मिळणार का अशी धाकधुक वाटत होती.
मुख्यमंत्री देवेंद्रजी आले आणि म्हणाले, "चला अंकाचे प्रकाशन करू या ! "
उत्साह आणि आनंद या दोन्ही भावनांनी मनात झालेल्या गर्दीत आपोआप आवश्यक हालचाली होऊ लागल्या.

तिथे जमलेल्या साऱ्या मंत्री, आमदार, खासदार, आणि काही महत्वाच्या प्रतिष्ठित व्यक्तिंच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी, मखमली वेष्टणात बांधून ठेवलेले ऐसी अक्षरेचे अंक बाहेर काढले आणि आम्हां प्रत्येकाच्या हातात अंक देत या विशेषांकाचे प्रकाशन केले. झटपट फोटोग्राफरने या अविस्मरणीय सोहळ्याचे फोटो काढलेही.
नंतर आम्ही शिक्षण मंत्री मा. विनोदजी तावडे यांच्या दालनांत गेलो तिथेही गर्दी.
विनोदजींना अंक दिला.
Image may contain: 6 people, people smiling, people standing  
ऐसी अक्षरेच्या या अंकात विविध मराठी वर्तमान पत्रात प्रसिद्ध झालेले ललित वैचारिक साहित्य घेतले आहे. लो.बाळ गंगाधर टिळक यांचे केसरीमधील दोन लेख या अंकात आहेत. इ.स. १८९५ मधल्या केसरीच्या अग्रलेखात लोकमान्यांनी शिवरायांच्या स्मारकाच्या बाबतीत आपले विचार मांडले होते. तर १९०५ च्या केसरीच्या अग्रलेखातले लोकमान्यांचे मराठी भाषेविषयीचे परखड विचार आजच्या काळात किती महत्वाचे आहेत हे लक्षात येते. हा अंक वाचनीय आहे. तरुणांनी जरूर  वाचावा. 

ह्या सुन्दर अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते  व्हावे, हा माझ्यासाठी विलक्षण आनंदाचा योग आहे.  असे काही क्षण अनुभवांयला मिळणे हे सुख ऐसी अक्षरेने दिले. गेली चौदा वर्षे अव्याहत चालू असलेला हा आगळावेगळा उपक्रम आहे. 

मस्त्त वाटतंय.
हा आनंद मित्रांना शेअर करायलाच हवा ना.

ऐसी अक्षरे चा अंक विनामूल्य असतो. 

पद्मनाभ हिंगे, पुणे. 
२२ जून २०१७.


Tuesday, 30 May 2017

'माय नेम इज शीला शिलाकी जवानी !'



'माय नेम इज शीला शिलाकी जवानी !'

      
   ओळखलंत

     थोडा ताण द्या ना…. 
     नीsss निरखून पहा….
     लाजू नका गडे ….
     कोणी ओरडणार नाही….  
     बाईंकडे इतके निरखून काय पहाता म्हणून कोणी विचारणार नाही
   म्हातारीच तर आहे ना ! हां आता ज़रा नीट नेटकी दिसते आहे खरी. व्यवस्थित नट्टा पट्टा केलाय बाईंनी . केस पांढरे दिसत असले तरी नीट चापून चोपून बसवले  आहेत. वय जास्त दिसत असलं म्हणून काय झालं, म्हातारीने तोंडाला रंगीत ओष्ठकांडी-लिपस्टिक-लावलीये, पावडर कुंकू केलंय. त्यामुळे चेहरा कसा टवटवीत एकदम फ्रेश दिसतोय. नक्कीच म्हातारी तरुणपणी ज़रा जास्तच दिलखेचक दिसत असावी, नाही का ? तुम्हालासुद्धा असं वाटतंय ना ? ज़रा एनलार्ज करून पहा. काही ओळख पटतेय का ?  
अजून नाही ओळखता आलं ? कम्माल आहे 
                                                 
                                                
                         
                    चला, आणखी एक फोटो दाखवतो. पहा.                                            


                       आज्जीबाई नाचतच आलेली दिसतेय.
  आता तरी ओळखलंत का ?
    आता ओळखलं असावं बहुतेक तुम्ही.
    हा हिरवट अवतार असून असून असणार तरी कोणाचा ?
    तुम्ही ओळखलं असेल तर ठीक, नसेल तर मला विचारा.
    म्हणजे मीच फोटो दाखवतोय तर मीच सांगणार ना.
          तीन वर्षे झाली. ही म्हातारी रंगमंचावर आली ती नाचत नाचत. गिरक्या घेत. मस्त लचकत मुरडत. आणि गाणं कोणतं, तर  'माय नेम इज शीला..शिलाकी जवानी !'
          या म्हाताऱ्या शिलाच्या एन्ट्रीवर उपस्थितांनी शिट्ट्या काय वाजवल्या..आरडा ओरडा काय केला, काही विचारू  नका. नुसता धिंगाणा….
          एंट्रीच  जबरदस्त मग शिट्ट्या तर येणारच. म्हातारीला या वयातसुद्धा डिमांड !!
          माझ्या तरुण मैत्रिणींनो प्लीज जेलस होऊ नका.
           या बाई नसून बाईंच्या वेशात प्रकटलेला पुरुष आहे. आणि 'तो मी नव्हेच' असं मी कधीच म्हणणार नाही....  कारण तीनाही तोमीच आहे.  
          खूप वर्षांनी मी रंगमंचावर आलो ते अश्या स्त्रीवेशात. शाळेत नाट्यवाचनाच्या स्पर्धेत मी भाग घ्यायचो. कॉलेजमधे कधी संधी नाही मिळाली. सुदर्शन केमिकल्स मध्ये असताना भरत नाट्य मंदिराच्या ललित औद्योगिक एकांकिका स्पर्धेत मात्र मला संधी मिळाली. रंगमंचावर येण्यात एक सुरेख आनंद असतो. हा आनंद मला त्यावेळी मिळाला. छोट्या छोट्या भूमिका करायला मिळाल्या, कधी श्रीकृष्णाची मुख्य भूमिकाही करायला मिळाली. दूरदर्शनच्या एका टेलेफिल्ममध्ये एक छोटीशी भूमिका करून छोट्या पडद्यावर झळकायची एक सुप्त इच्छाही पूर्ण झाली. अभिनय करायची खूप हौस होती, फिटली. आजही संधी मिळाली तर मागेपुढे पाहणार नाही.
          अशी स्त्रीची भूमिका मात्र प्रथमच साकारायला मिळाली. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या स्त्रीपात्राच्या भूमिकेला रसिक प्रेक्षकांची दाद तर मिळालीच, प्रथम पुरस्कारही मिळाला. प्रपंचाच्या नित्य धबडग्यात थोडासा का होईना हा आनंद उपभोगता आला. या स्त्रीरूपाचं सारं श्रेय मात्र त्या रंगवेशभूषाकाराचंच.
           कसबापेठेत पूर्वी राहत असताना ४५-५० वर्षांपूर्वीची एक रंगपंचमी आठवते. रंगपंचमीच्या दिवशी आमच्या गल्लीत मोठा धिंगाणा असायचा. खूप धमाल असायची. एकदा आमच्याच गल्लीतला प्रताप मालेगावकर हा स्त्रीवेशात प्रकटला. सोज्वळ चेहरा, डोईवर पदर, हातात स्वयंवराचा हार घेऊन !! देखण्या चेहऱ्याचे वरदान आणि सडपातळ बांधा यामुळे त्याचे हे स्त्रीरूप पाहण्यासाठी सारी गल्ली गोळा झाली होती. खरोखरीच खूप देखणे रूप होते ते. हा पुरुष आहे हे चटकन कुणालाही कळलेच नाही. जो काही मेकअप होता तो सुद्धा अगदी साधा घरगुती होता. गल्लीतला स्त्रीवर्गसुद्धा तोंडाला पदर लावून हसत होता. मुलींमध्ये तर पुढे कितीतरी दिवस गप्पांत हाच विषय होता. प्रताप पुढे व्यावसायिक नाटकात काम करायचा. त्याचे ते देखणे स्त्रीरूप, ते चालणे, वागणे, लाजणे आजही माझ्या आठवणीत आहे.
          गेल्या शतकात बालगंधर्वांचे ते अजरामर शालीन स्त्रीरूप आजही मराठी रसिक मनामध्ये आदरणीय होऊन बसले आहे. अनेक कलाकारांनी आपापल्या कुवतीप्रमाणे स्त्रीभूमिका रंगमंचावर गाजवल्या. रितेश देशमुख हा प्रसिद्ध अभिनेताही एका हिंदी चित्रपटात स्त्रीवेशात फारच सुंदर दिसला होता. ' कुणीतरी येणार येणार गं ' म्हणत नाचणारा सचिन स्त्रीवेशात किती गोड आणि मोहक दिसला होता, हे आठवतंय ना. आताशा छोट्या पडद्यावर काही अभिनेते स्त्रीवेशात अवतरतात. त्यांच्या त्या भूमिकांना ते उत्तम कलाकार असल्याने उत्तम न्यायही देतात. पण तो भडकपणा, अतिरेक सारखा सारखा बघायला नकोसा होतो. मी केलेली शीला आगाऊ होती, खटयाळ होती, मात्र वाहवत गेली नाही. असो.
           इथे मी कुठेही समीक्षकाच्या नजरेतून पहात नाही. तो माझा पिंडच नाही. मनातली एक इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद इतरांना वाटला की वाढतो म्हणतात. म्हणून हा आनंदी अनुभव सांगतोय.

पद्मनाभ हिंगे, पुणे
३० में २०१७.