चिठ्ठी
ते म्हणाले होते,
तुझं कर्ज माफ करतो,
तुझ्या जिंदगानीचं दुर्दैव
आता लवकर साफ करतो ...
मी पाहू लागलो वाट
पहातच राहिलो वाट ...
आणि मग आली कुठलीशी लाट
ते गेले वाहून
अन् त्यांचे शब्द त्यांच्याचबरोबर
गेले गपगार होऊन
.....
मग हे आले ,
ह्यांना त्यांचे ऐकवले,
हे डोळ्यांनी रडले,
म्हणाले कळवळून,
तुझ्या व्यथा आम्हीच जाणतो,
घाबरू नकोस अन्नदात्या
तुझ्या हातापायात बळ आणतो ..
मला थोडा हुरुप आला,
घुटमळणा-या जीवात
थोडा जीव आला.
........
हिवाळा गेला उन्हाळा गेला,
गेला कसला ?
उन्हाळ्यानं मुक्कामच वाढवला.
भेगाळलेल्या जमिनीनं
पायांनाही भेगा दिल्या
आता तर ..
सगळ्याच सावल्याही
गायब झाल्या.
कसचं काय न् कसचं काय
नुसताच कट्टीबट्टीचा खेळ झाला
.......
मग दोरालाच माझी दया आली
म्हणाला तुझीमाझी गट्टी
येतो तुझ्या गळाभेटी
चल बांध तुझी वळकटी
पण निघण्याआधी
जमलंच तर लिहून ठेव
हीच चार ओळींची चिठ्ठी .....
09.12.2015
पद्मनाभ हिंगे
Realistic life
ReplyDelete