Monday, 13 March 2017

Mee-

                                                        ॥ ॐ गं गणपतये नम: ॥

काहीतरी लिहावंसं वाटणं किंवा लिहायची हौस असणं हे माझ्याबाबतीत तसं खूप जुनं, म्हणजे अगदी शाळेत असल्यापासूनचं. पण काय लिहायचं, कसं लिहायचं, विषय कोणता निवडायचा ? ही समस्या असायची. बरं कोणाला विचारावं, सल्ला घ्यावा तर आपली चेष्टा होईल की काय अशी भीती वाटायची. सतरावं अठरावं वर्ष म्हणजे तारुण्यातलं ताजं पदार्पण. अवतीभवती सारं छान छान असायचं दिसायचं. ओह पण त्यावर कसं काय लिहिणार ना? आजच्यासारखं थोडंच मोकळं वातावरण होतं तेंव्हा. हो अगदी मुलांसाठीसुद्धा बंधनं असायची ! वडीलधाऱयांचा धाक असायचाच. मग आता लिहायचं तरी कोणत्या विषयावर ? लिहायला तर हवंच. असं हात जोडून स्वस्थ का बसायचं ? एखाद्या विशेष दिवशी जे काही जसं काही जमेल ते लिहायचंच 'ऐसा' निश्चयच केला मनाशी आणि एखादा लेखक असल्याच्या थाटात अस्मादिक वही पेन घेऊन लिहावयास बसले.
बघा काय आणि कसं लिहिलंय ते.. हसायला पूर्ण संमती आहे.


मी.. एकच अक्षरी शब्द. त्यात केवढा तरी अर्थ भरलाय ! तो काय कधी सांगून कळत असतो, वाचून कळत असतो ? छे, तो समजून घ्यावा लागतो. त्याचा अर्थ कुणाला नीटसा कळत नाही, कळला तर सांगता येत नाही. ज्या वाक्यात "मी" हा शब्द आहे, अशी कितीतरी वेगवेगळ्या अर्थांची वाक्ये आढळतील. ' काय बावळट आहे "मी", आपल्या बावळटपणामुळे चूक झाली की उपहासाने "मी" हां शब्द वाक्यात घालतो, तर कधी विनम्रता, विनय दाखविताना "मी" आपला एक सामान्य माणूस, परमेश्वर सारं करतो, "मी" फ़क्त कारणापुरता.' अशाप्रकारे मी वापरला जातो, तर कधी गर्वाने फुगून, "मी" केलं म्हणून तर सारं व्यवस्थित झालं, "मी" नसतो तर कोणालाही काहीही करता आलं नसतं. वगैरे ....
या सर्वप्रकारच्या "मी" मधून "मी स्वतः" कोणता बरे असेन ? जिथं तिथं मीपण दाखवणारा गर्विष्ठ 'मी' मुळीच नाही असं मला आपलं वाटतं. 'मी' वरील कोणता ? हे ठरविणारा मी कोण ? इतर ठरवतील तो 'मी'.....
पण मी कृतघ्न कधीच असणार नाही. माझ्या हातून कदाचित दुसऱ्यानं मजवर केलेल्या उपकाराची परतफेड होणार नाही, पण मी माझ्यावर झालेल्या उपकाराची जाणीव ठेवीनच ठेवीन. उपकाराची परतफेड जाणीवपूर्वक करीत राहीनच राहीन. आणि त्यांच्यासाठी ईश्वराजवळ प्रार्थना करीन की, ' परमेश्वरा त्यांना सुखी ठेव, आनंदीत ठेव, उत्साहीत ठेव. संस्कृतमधे एक श्लोक दहावी अकरावीत असताना आम्हाला होता. त्याचा भावार्थ असा की, ' आपण दुसऱ्यावर केलेल्या उपकाराची वाच्यता कोणाकडेही न करणे आणि दुसऱ्याने आपल्यावर केलेल्या उपकाराची मात्र आपण चारचौघात वाच्यता करणे हे असिधाराव्रत फार कठीण असते.' असो.. तर मी सदोदीत कृतज्ञच राहीन.  .......   शुक्र. दि. १ - १ - १९७१। ..


तर अशाप्रकारे काहीतरी लिहिण्याला सुरुवात झाली. तश्या ट ला ट जोडून काही कविता करण्याचा प्रयत्न चालू असायचाच. शाळेच्या वार्षिकात एक चार ओळीची कविता घेऊन मी एका संबंधित शिक्षिकेकडे गेलो होतो, तेंव्हा बाईंनी मला विचारले, "तूच केलीस का रे " मी मोठ्या तोऱ्यात 'हो, मीच लिहिली आहे,' असं उत्तर दिलं. बाईंना ते खटकलं होतं. त्यांनी मला झापलं होतं. तो माज होता की कविता लिहिण्याचा जास्तीचा अभिमान होता, ते आज नाही सांगता येणार. इतर विद्यार्थ्यांपेक्षा कविता लिहू शकणारा मी कोणी वेगळा असल्याची भावना होती, नाही आठवत. पण बाईंच्या त्या झापण्यामुळे आपलं काहीतरी चुकलं आहे, याची मात्र जाणीव झाली. ती जाणीव आजही आहे.
आज सहजच ती जीर्ण होऊ घातलेली वही उघडली आणि पहिल्याच पानावर असलेलं हे टिपण वाचलं. वाटलं, इतरांनाही वाचायला सांगावं, आवडलं तर आवडेलही......

पद्मनाभ हिंगे,
पुणे. 
दि. १४ मार्च २०१७  
 

2 comments:

  1. आशय ते विषय तुमच्या मनात बरोबर जमतं....

    ReplyDelete