Friday, 12 May 2017

aajachee dainandinee


                            आजची दैनंदिनी 
          
          मी चक्क चकणा - चिकना नव्हे - चकणा हेकणा झालोय.
     दचकू नका आणि का म्हणून काय विचारताय ?
     माझा डावा डोळा आणि उजवा डोळा दोघेही एकाच वेळी दोन्ही दिशेने येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवता ठेवता  आपल्यातले समांतर अंतर गमावून एकमेकांपासून जरा दूर सरकलेत !!!
     खरं नाही ना वाटत ? बघा ना दोन्ही एकमेकांपासून समान्तर अंतर राखूंन असले तरी त्यांच्या  दृष्टीतला समतोल व्यवस्थित होता. आता   बेशिस्तीमुळे दुरावा वाढलाय असंच मला वाटतंय !
     रस्त्यावर उत्साहाने ओसंडून वाहणाऱ्या कचरा पेट्या, बेबंद अतिक्रमणामुळे आणि स्वैर वृत्तीने वागणाऱ्या  सुबुद्ध मनुष्य स्वभावामुळे होत असलेली प्रगती की अधोगती पाहणारे हे माझे दोन्ही डोळे स्वतःची मूळ जागा सोडून जरा ऐसपैस झालेत. आजूबाजूची बेशिस्त, बेजबाबदार वृत्ती याचा वैताग वैताग आलाय. त्यामु़ळे चिडचिड,आदळआपट वाढली आहे.
     सकाळी कामावर निघावे तर गाडी चालवणे म्हणजे कसरत झाली आहे. रोजचाच आटापिटा करावा लागतोय. उजवीकडून वेगाने ओव्हरटेक करणारी वाहने पाहू की झपकन विरुद्ध दिशेने येत डावीकडून जाणारी वाहने यांच्या होणाऱ्या अचानक आक्रमणाकडे लक्ष ठेवू ?  हिरव्या दिव्याच्या सिग्नलची वाट पहात उभं राहावं तर मागून टॅहॅ टॅहॅ करणारी कलेजात जाणारी, हापिसात जाणारी, शिणिमाला जाणारी, त्ये शापिंग की काय  म्हणत्यात त्याला जाणारी, जणू मागे वाघ लागलाय की काय असं वाटावं इतकी घाई झालेली, की घाईची लागल्यागत वाहने चालवणारी बुद्धिमान म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यात राहणारी माणसं, मगरूर चिडका त्रासिक चेहरा करून मजकडे पाहू लागतात. सिग्नल तोडणारे वाहनचालक, कॉर्नरला गाडी लावून निवांत गप्पा मारणारे, तिथेच अतिक्रमण करुन ऐसपैस बसलेल्या भाजी किंवा फळे विक्रेत्याकडून घासाघीस करीत उभे असलेले ग्राहक पाहिले की चिडावं रडावं की निराश व्हावं असा प्रश्न पडतो. सावकाश मधून जाणारी वाहने, सुसाट वेगाने नागमोडी वळणे घेत पळणारी वाहने , स्वतःच्याच नव्हे तर इतरांच्याही  जीवावर उदार होणारी मस्तवाल माजोर्डी माणसं. वाहतुकीचे सर्व नियम संकेत तुडवणारे वाहनचालक पाहिले की चिडचिड होते.   मनाला वाटले की थांबावे, स्पीड कमी करावा, थोडेसे  वाहन बाजूला घेऊन बसल्या बसल्या  पायाने साइड स्टॅंड लावून कुठेही कशीही गाडी पार्क करावी, असे वागणारी माणसं पाहिली की वाटतं आपण गेल्या जन्मी असं काय पाप केलंय की, हे सारं सहन करणं आपल्याच नशिबी यावं.
     गेल्या वर्षी विलायतेला गेलो होतोतेंव्हा तिथली शिस्त, नागरीक म्हणून व्यवस्थित जबाबदारी पाळणारे लहानमोठे सर्व रहिवासी पाहिले तेंव्हा किती बरं वाटलं होतं.
     कुठेही कचरा दिसणार नाही. वाहनांची सतत वर्दळ असते. अगदी भरपूर वाहने रस्त्यावरून धावत असतात. पण लाल दिवा लागला की स्टॉप लाईनच्या मागेच वाहने उभी राहतात. हिरवा दिवा लागल्या- शिवाय कुठलेही वाहन पुढे निघत नाही. मागून कोणी हॉर्न वाजवत नाही. पादचारी रस्ता ओलांडायचा असेल तर त्या ठिकाणी असलेल्या यंत्रावरील पुशबटण दाबून हिरवा दिवा लागण्याची वाट पाहतो. तेथे लाल दिवा असेल तर पादचारी असो वा नसो, गाडी हिरवा दिवा लागेपर्यंत थांबते.  एकदा लंडनहून मध्यरात्री लेस्टरला जाताना चारपांच ठिकाणी सिग्नलला आमची गाड़ी थांबली. आमच्या मागेपुढेही काही गाडया हिरवा सिग्नल लागेपर्यंत थांबल्या होत्या. आणि विशेष म्हणजे, डाव्या उजव्या बाजूने जाणारे एकही वाहन नव्हते ! आमच्या लाईनमधल्या गाड्या त्या त्या चालकांनी पुढे दामटल्या असत्या तरी पुढे कुठेही लपून बसलेला ट्रेफिक हवालदार दिसत नव्हता. घाई सर्वांना असतेच पण कोणीही वाहतुकीचे नियम तोडत नाही. नव्हे त्यांच्या अंगातच शिस्त भिनलेली आहे. तिकडे विलायतेला मला कोणत्याच रस्त्यावर कुठलेही होर्डिन्ग दिसले नाही. कोणत्याही नेत्याच्या वाढदिवसाचे अनधिकृत बोर्ड दिसले नाहीत.वरात, मिरवणूक नजरेस पडली नाही. चालता चालता एखादा छोटासा चार पाच वर्षांचा मुलगा फूटपाथवर धावत येतो हातातला कागद, चॉकलेटचे रॅपर लीटर बॉक्समधे टाकतो. कमाल म्हणजे मला रस्त्यावर वाहतूक नियमन करणारा एकही पोलीस कर्मचारी आढळला नाही.  फोटोत पहा शिस्त आणि स्वच्छतासुद्धा.
     खूप काही सांगायचं आहे पण  तुम्ही म्हणाल 'हा शहाणा कुठं फारीनला गेला अन् आम्हांला शहाणपण शिकवायला लागला'; असो.
     आम्ही इंग्रजांचे पोशाख जवळ केले, भाषा अवगत केली, खूप सवयी घेतल्या. चमच्याने  खाण्याच्या सवयी घेतल्या. पण हाय...
त्यांची शिस्त, स्वच्छता नाही घेतली, आपल्या शहरावरचे देशावरचे प्रेम आणि स्वतःची जबाबदारी यात कोणतीच गल्लत इथला लहानापासून मोठया पर्यंतचा नागरीक करत नाही.
गेले काही दिवस मी Whats App / Facebook वर मनातली भोवतालच्या या सतत बिघडत चाललेल्या  परिस्थितीबद्दलची ही खदखद, चिडचिड जमेल त्या शब्दांत, थोडया तिरकस तिरसट खोचक पद्धतीने व्यक्त करण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतोय. जसे की,

 'अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्याकडून मी वस्तु विकत घेणार नाही, असा निश्चय ग्राहकाने केला तर ?'

'मला मनापासून वाटतंय, मी हेल्मेट घालायला पाहिजे...
पण मला ओशाळायला होतं..
लहानपणापासून सगळेच सांगतात की..तुला डोकंच नाही...'

     थोडेफार लाईक्स मिळतात, स्माईली येतात बस्स. पण गांभीर्य कुठे दिसत नाही.

     परवा, आजूबाजूच्या बिघडत चाललेल्या परिस्थितीबाबत मनातली चलबिचल व्यक्त करण्यासाठी  'मोरू ' नावाने पुन्हा एकदा मनाने शाळेत गेलो, शाळेत तुमच्यासारखे अवतीभवती अनेक मित्र आपापल्या बाकांवर बसलेले दिसले.

मोरू....(कल्पनेतला मी-झोपेतला मी-आजच्या जमान्यातला मी )
बापाच्या वरच्या पट्टितल्या हाकेने मोरू नाईलाजाने उठला.
"कार्ट्या..कालचा गृहपाठ (एक्च्युअली होमवर्क म्हणायला हवं होतं)कोण तुझा आजा करणार आहे?" आवाजाची पट्टी खाली यायचं नाव घेत नव्हती. "शिस्त म्हणून नाही कार्ट्याला ! खुशाल लोळतोय अंथरुणात. चल आटप आणि घे दप्तर. आणि लिही निबंध. कशावर लिहायचा होता ?"
उठला बिच्चारा मोरू. कसाबसा आवरुन बसला.घेतली वही गृहपाठाची आणि लागला खरडायला...
आणि लिहिला गृहपाठ. बघा वाचून.
'सुप्रभात गुरुजी. (तुम्हीच गुरूजी-तुम्हीच विद्यार्थी मित्र)

(माझ्या निबंधाचा विषय आहे...)
'आजची सकाळ'
     आज नेहमीप्रमाणे उजाडले. बाबांच्या आरडाओरडीने जाग आली. खिडकीतून बाहेरचे दृश्य दिसले अंधाराच्या गादीवर प्रकाश आळोखे पिळोखे देत उठून बसू लागला होताबाबांच्या कर्कश्श आवाजामुळे खिडकीतून कित्येक दिवसांनी दिसलेल्या दोन तीन चिमण्या उडून गेल्या होत्या. समोरच्या घराच्या खिडकीवर निलाजरी कबुतरं स्वतःभोवती गिरक्या घेत घुटमळताना दिसत होती. खिडकीत टांगलेल्या कुंडीतली तुळस नियमित पाणी न मिळाल्याने मान टाकून कशीबशी उभी होती. बाबा टीव्ही समोर बसून एकसारखे चॅनेल बदलत होते. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. आम्हा मुलांना मात्र ओरडा आणि बाबांच्या टीव्हीचा आवाज मोठा! आई तिकडे मोबाईलवर खेळत होती आणि स्वत:शीच हसत होती. माझ्याकडे तिचे लक्षच नव्हते! वाहनांचा खडखडाट वाढला होता. टाकीतल्या  पाण्याची धार  बारीक झाल्याची बिल्डिंगीतली बोंबाबोंब ऐकू येऊ लागली होती. टीव्हीच्या आवाजामुळे बाबांना बहुधा ऐकू येत नव्हते.                बाबांसमोर प्रगतीपुस्तक सहीला ठेवून चार दिवस झाले. निबंध कसा लिहायचा यासाठी बाबांना मी कालपासून तीनचारदा विचारले. मला वाटले बाबा सांगतील की चल लिही. 'आज सकाळी मी लवकर उठलो, शौचमुखमार्जन करून देवासमोर बाबांनी शिकवलेले स्तोत्र म्हटले. मग मी सूर्यनमस्कार घातले आणि दूध पिउन अभ्यासाला बसलो.!'.... पण तसे काही केले नाही. पुढे सांगता येईल ऐसे काही नाही. बस्स आज एवढेच लिहिता आले.'
तुमचा विद्यार्थी,
मोरू
(उर्फ पद्मनाभ)
असो. 

       अगदी प्रत्येकाने-जोपर्यंत आपण स्वत: जाणीवपूर्वक नियमांचे पालन करणार नाही तोपर्यंत
वाहतूक सुरळीत होणार नाही-मी कचरा सार्वजनिक जागेत टाकेन, तोवर कचऱ्याचे ढीग वाढतच जाणार-हे लक्षात घेऊन व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात स्वयंशिस्तीने वागायचे ठरवले तर परिस्थितीत सुधारणा होईल.     
     आज आशेचा एक किरण अनुभवायला मिळाला, खूप बरे वाटले. एखादी का होईना व्यक्ती सकाळच्या घाईगर्दीच्या वेळेत वाहतुकीचे नियम पाळताना दिसली. झालं काय, माझ्यापुढे एक स्कूटर(बहुधा एमएच १२ .. ७२३७)लाल सिग्नल असल्याने उभी होती. मला दत्तवाडीकडून म्हात्रे पुलाकडे जायचे होते. डाव्या उजव्या बाजूचे लाल दिवे लागले आणि आमच्या आजूबाजूची सारीच वाहने जणू पडत्या फळाची आज्ञा असल्यासारखी छू: म्हणावी तशी सुसाटली. माझ्यापुढचा शिरस्त्राण(हेलमेट)घातलेला आणि मागे कुमारवयीन मुलगा असलेला, स्कूटरवाला स्टॉपलाइनच्या अलीकडेच अजूनही थांबलेला होता! हिरवा लाइट लागल्यावर तो निघाला आणि मीही ! वाटलं होतं जाता जाता बोलावं, पण घाई असते ना. ठीक आहे. या कड़क उन्हाळ्यात ही गोष्ट एक थंडगार झुळूक आणि आशेचा सकारात्मक किरण दाखवणारी वाटली. 

पद्मनाभ हिंगे, पुणे. 
दिनांक:१२.०५.२०१७ 



No comments:

Post a Comment