Sunday, 12 July 2020

पुस्तक परिचय

ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी

दिवस ५वा

शहरात कधीतरी वीज गेली की एकतर वीजवितरण कंपनीच्या नावानं लग्गेच शिमगा आणि फटाफट इन्व्हर्टर चालू.
आणि सध्या तर काय *लॉकडाऊन* ! ! 

आम्ही गावी असलो ना की अगदी ठरलेल्या वेळेवर रात्री ८.३० ला दोनपाच मिनिटांसाठी वीज जाते. थ्री फेज टू सिंगल फेज किंवा .. सिंगल फेज टू थ्री फेज .. चेंज ओव्हर ...

आम्ही चिडतो का ? तर नाही..
सवयीचा भाग म्हणून सहनही करीत असू का ? तर तसंही काही, खरंच नाही ! 
उलट,  
खाडखाड दार उघडत 
पुढच्या अंगणात पळत जातो ..

आता सध्या शहरांत घराच्या बाहेर पाऊलही टाकता येत नाही. इथं कसं बैठं घर अन् थोडं अंगण. आजुबाजूला सारं निर्मनुष्य वातावरण.
सगळीकडे मिट्ट अंधार असतो.
तुम्ही सारे ' पुढं कसं होणार ? सगळाच अंधार दिसतोय.. '  म्हणत काळजी करत बसाल  आणि आम्ही, वर, आकाशात पाहू लागणार !  
आहाहा ..
आभाळभर चांदणं असतं ! ! 

अगणित चांदण्यांचे जणू लुकलुकणारे डोळे आम्हांला पाहात असल्याचा भास होतो. 
कधी तर असं वाटतं, की दुरून या चांदण्या हळूच कानी जणू पुटपुटत असाव्यात.

' कशाला चिंता करतोस वेड्या ' ,    

आम्ही डोळे परमात्म्याचे, नजर आमुची तुझ्यावरी, 
नजरेला घे जरा सरावुनि अंधाराची सवय करी.
पळ हे जातील भरभर भरभर 
उषादेवीला फुटेल पाझर 
घेऊन येईल ती डोईवर 
कलश सुखाचा तुजसाठी रे 
अंधाराचा फोडुनि डोंगर...

आपण माणसं ना स्वतःला अति शहाणे समजतो. खरंय ना ? 
सध्या काय तर सारेच घरकोंबडे.
याचा वैताग, त्याचा वैताग ! यांच्यावर टीका, त्यांना नावं ठेव...
सोशल मीडिया, टीव्ही पाहून चिडचिड. पण मग वाचन करावं ना ! वाचनावरून एका छानश्या लेखातला विचार आठवला ...
     " बायबलात अशी एक कथा आहे, की प्रारंभी मानवाच्या सगळ्या मुलांची एक भाषा होती. त्यामुळे मुंग्यांप्रमाणे त्यांची संघशक्ती, कर्तृत्वशक्ती मोठी अचाट होती. मुंग्यांनी हा हा म्हणता वारूळ तयार करावे, तसे स्वर्गाप्रत जाण्यासाठी ती मुले बँबेल या नावाचा गगनभेदी मनोरा करू लागली.तो झपाट्याने पुरा होत असल्याचे पाहून  स्वर्गातल्या बापाला वाटले, की आता कांही आपल्या विश्वव्यवस्थेची धडगत नाही. माणसांच्या लीला मृत्युलोकाच्या मर्यादेत ठीक आहेत. स्वर्गात त्यांचा उपद्रव नको. म्हणून त्याने, ' तुम्हांला नाना भाषा येवोत ' असा शाप दिला. मूर्ख मानवांना वाटले, हा वर आहे ! भाषा अवगत झाली, तशी त्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली. पण परिणाम काय झाला ? एकाची भाषा दुसऱ्याला समजेना.सर्वत्र एकच गोंधळ उडून गेला.त्यांची फाटाफूट झाली. संघशक्ती मोडली. कलह माजले. बांधलेला मनोरा कालांतराने पडला आणि माणसाची कर्तृत्वशक्ती क्षीण होऊन बडबडत राहण्यातच त्याला इतिकर्तव्यता वाटू लागली.."

चांदण्यांचे कवडसे या बा.भ.बोरकर यांच्या पुस्तकातील माझा मौनवार या लेखातील हा तो विचार आठवला.

येतंय का कांही लक्षात ? 

बेलवलकर गृहनिर्माण

१ एप्रिल २०२०

Saturday, 11 July 2020

पुस्तक परिचय

ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी

 दिवस ४था

खूप दिवसांपासून एक पुस्तक कुठं मिळतंय का ते पाहतोय. अनेक ग्रंथालयांत, पुस्तकालयांत,  जुन्या वाचनवेड्या पुस्तकप्रेमींकडे चौकशी करून झाली. 
उमरखय्यामच्या रुबायांचा मराठीत खूप सुंदरसा अनुवाद गजानन व्यं.वाघ यांनी केला होता.
हे पुस्तक कांही मिळालं नाही. तुम्हांला मिळालं तर नक्की वाचा.

फार फार वर्षांपूर्वीची (फार फार म्हणजे १९७३ची-साधारण ४७ वर्षांपूर्वी वगैरे ) ही गोष्ट. माझ्या हातात हे पुस्तक पडलं. 

धडाधडा एकदा दोनदा हे पुस्तक वाचून काढले. त्यातल्या थोड्या पचनी पडलेल्या रुबाया वहीत लिहून ठेवल्या होत्या. 
लॉकडाऊन आहे. वेळच वेळ. जुन्या पोतड्या, फोटोसंग्रह शोधताना ही वही हाती लागली.  आज त्या वहीची सारी पानं पार पिवळी पडलेली आहेत. माझ्यासाठी मात्र  ऐतिहासिक महत्व लाभलेली ही पिवळी पानं  वाचतांना छान वाटलं. 
त्यावेळी सारं वाचन एक वाचक म्हणूनच झालं होतं. साहित्याचा अभ्यास असतो वगैरे हे तेंव्हा तसं माझ्या कळण्यापलीकडचंच होतं. अर्थात आजही तीच परिस्थिती..
त्या गुलाबी काळातल्या मनातल्या *परि* ची *स्थिती* 
आणि आताच्या पोक्त काळातल्या मनातल्या  *परि* ची *स्थिती* 
यां दोन्ही *परि-स्थिती* त  फारशी तफावत नाहीच.
तारुण्याच्या हंगामातला तो वाचन प्रवास आणि आता हा मुरलेल्या वयांतला पिवळी पानं झालेल्या वहीतला,  लॉकडाऊनकाळातला ..

तर तुम्हां मित्रांसाठी यातल्या चार  रुबाया खास शुभेच्छांसह, का, तर तुम्हीही या पुस्तकाचा शोध घ्याल हा विश्वास.

१.
छायेत तरुच्या इथे कोर भाकरीची 
मदिरेची सुरई आणि वही कवितेची 
   अन् असता तू लाडके, बाजुला गात 
काननास येईल मौज तया स्वर्गीची 

२.
त्या वितंडवादी विश्वाच्या गुंतून 
राहू दे पंडिता ! बैस इथे येऊन ! 
   ये माझ्यासंगे जगापासुनी दूर 
जे तुला हासते त्यासच घे हासून ! 

३.
शपथेवर ज्यांनी मदिरा प्रीती त्यजिली 
त्यांचीच उभी जर असेल स्वर्गी टोळी 
    शंकाच नको ! तो असेल स्वर्ग रिकामा 
जितुकी ही माझी मूठ रिकामी ठरली ! 

४.
हा पहा उमलला गुलाब बोले हसुनी 
"या जगतामध्ये अवतरलो मी फुलुनी
    उकलून रेशमी गोफ सुकोमल तनुचे 
उधळितो जवाहिर आतिल या उद्यानी ।! "

मंडळी, तुम्हांला जर हे पुस्तक कुठे उपलब्ध असल्याचे कळले तर या सुंदर रुबाया जरूर वाचा.
पुस्तक छोटसंच आहे.
 उमर खय्यामच्या रुबाया
मराठी अनुवाद:गजानन व्यं.वाघ

बेलवलकर गृहनिर्माण

३१ मार्च २०२०

Friday, 10 July 2020

पुस्तक परिचय

ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी
 
दिवस ३ रा

 " संसारामधि ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको "

" खरंच, वाचकहो! भटकायला तरी कुठं जाणार ? हितचिंतक वाटेत भेटले तर ते चहासाठी हॉटेलात ओढतात आणि ते किमान चौघं-पाचजण असल्यामुळे मला आत ओढू शकतात. त्यामुळे आपलं घरी राहिलेलं बरं ! ' संसारामधि ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको ' हा लहानपणीच अनंतफंदीनं मारलेला फटका मला आजतागायत आठवतो आहे ! "

मंडळी, या लॉकडाऊनमध्ये तुम्ही घरीच बसा हा सल्ला ऐकून तुमचे कान किटले असतील ना ! पण उपरोक्त अनंतफंदीनं मारलेल्या फटक्याची आठवण करून दिली आहे ती ' मी, वाचक आणि हितचिंतक ' या जयवंत दळवी यांच्या ' उपहास कथा ' या कथासंग्रहातल्या या कथेनं.

तुमचा स्वभाव कसा आहे ? 
भिडस्त की बेधडक ? 
बेधडक असेल तर, भिडस्त स्वभावाच्या मंडळींची गंमत कशी होते ते वाचायला तुम्हांला आवडेल. 
आणि भिडस्त स्वभाव असलेल्यांनी आपली कशी कुतरओढ होते ते जाणून, बघा जमतंय का स्वभाव बदलायला ते ! 

जयवंत दळवी, या सिद्धहस्त साहित्यिकाबद्दल आम्ही काय सांगावं ? पुरुष, सूर्यास्त या आणि अशी अनेक दमदार नाटकांचे लेखन दळवी यांनी केलंय.  
गंभीर, विनोदी कथा, कादंबऱ्या असं खूप काही सकस दमदार,  विचार करायला लावणारं विपुल लेखन करणारा हा बुद्धिमान लेखक.

विनोद आपल्याला हसवतो, ताजंतवानं ठेवतो. अश्याच दळवी यांच्या 'उपहास कथा' या संग्रहातील कथा तुम्हांला नक्कीच आवडतील.

बेलवलकर गृहनिर्माण, पुणे 
३० मार्च २०२०

Thursday, 9 July 2020

पुस्तक परिचय

ऐसीअक्षरे : महायुद्ध कोरोनाशी
 
*दिवस* *२ रा*

कधी तरी अशीही वेळ येते की चार भिंतींच्या बाहेर येणेच शक्य होत नाही. आपण खडखडीत असतो, पण बाहेर पडता येत नाही. कधी भूतो न भविष्यति अशी तुफानी पर्जन्यवृष्टी होते आणि आपण अडकून पडतो. आपण विचार करतो एखादा दिवस करु या सहन, पण पाऊस थांबण्याचं नावच घेत नाही.

चार दिवस उलटून गेले. मोबाईलवर व्हॉट्सअप, फेसबुक इत्यादी सोशल मीडियाचा कंटाळा आलाय. टीव्हीवर त्याच त्याच मालिकांचे पुनःप्रसारण आणि सतराशे साठ वाहिन्यांवरील त्याच त्या कोरोनाच्या बातम्या ऐकून कंटाळा आलाय. अचानक पुस्तकांच्या कपाटाकडे पावलं वळली आणि पुस्तकं चाळू लागलो....

...... त्या क्रूर औरंग्याच्या मगरमिठीतून आणि फुलादखानाचा विळखा तोडून आपली सुटका कशी करून घ्यायची या विचारांत शिवाजीमहाराजांची मानसिक अवस्था किती बिकट झाली असेल ? 
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित *राजा* *शिवछत्रपती* पुस्तकातील *महाराज* *आणि* *औरंगजेब* हे प्रकरण मी, महाराज यातून बाहेर पडले हा इतिहास माहीत असतांनासुद्धा अत्यंत औत्सुक्याने, अधीरपणे, कमालीच्या कुतुहलाने वाचू लागलो. किती वेळा वाचलं असेल ? 

दिवसांमागून दिवस जात होते. चार भक्कम भिंतींच्या कडेकोट बंदोबस्तात राजे अडकले होते. बाहेर रक्तातल्या प्रत्येक थेंबात महाभयंकर विषाणू ठासून भरलेल्या क्रूरकर्मा औरंग्याचे निष्ठूर नीच पहारेकरी. बाहेर पाय टाकताच असंख्य जीवघेणी मनुष्यरुपातली श्वापदे.
' औरंगजेब आपला प्राण घ्यावयास टपला आहे; केव्हा तरी अचानक झडप घालून तो कोणत्याही भयंकर रीतीने ठार मारून टाकील याची जाणीव महाराजांना होती .....'
अत्यंत *संयमाने* मनांतला एकमेव *संकल्प* पूर्णत्वाला न्यायचाय या उद्देशाने महाराज त्या कडेकोट चार भिंतीत संधीची वाट पहात होते ...

वाचतांना अंगावर रोमांच उभे राहात होते आणि अनेक दिवसांच्या या कठीण प्रसंगातून महाराज सहीसलामत बाहेर पडले, हे वाचतांना तुमचा कंटाळा कुठल्याकुठे पळून जाईल आणि शिवाजीमहाराज तुम्हांला बाक्या-जीवघेण्या संकटातून बाहेर पडण्याची कशी प्रेरणा देतात त्याचा अनुभव घेता येईल ..

हा सुटकेचा थरारच नव्हे तर अवघे शिवचरित्रच तुम्हीही जरूर वाचण्यासाठी हाती घ्या, ब.मो.पुरंदरे लिखित,  *राजा* *शिवछत्रपती*

बेलवलकर गृहनिर्माण, पुणे 
२९ मार्च २०२०

ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी

(वाचक मित्रांनो, सप्रेम नमस्कार ..२५ मार्च २०२०ला संपूर्ण देशात पहिला कुलूपबंद-लॉकडाऊन- जाहीर झाला. त्यानिमित्ताने वाचकमित्रांना मराठीतल्या विविध विषयांवरील पुस्तकांची ओळख करून देण्याचा एक प्रयत्न २८ मार्च २०२० ते १७ मे २०२० या एक्कावन्न दिवसांत आम्ही केला. पहिले अठरा दिवस कोरोनाशी महायुद्ध तर पुढील तेहतीस दिवस वाचू आनंदाने या शीर्षकाचा दुसरा भाग बेलवलकर हौसिंग च्या ऐसी अक्षरेच्या उपक्रमांतर्गत फेसबुक पेजवर अपलोड केला. माझ्या या ब्लॉगवरुन पुन्हा एकदा ही पुस्तक ओळख करून देत आहे. जरूर वाचा. प्रतिक्रियासुद्धा द्या, ही नम्र विनंती...पद्मनाभ हिंगे)

दिवस १ला

गेल्या बुधवारपासून संपूर्ण देशांत पंतप्रधानांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला.  सर्वांनाच घरी बसण्याचा सक्तीचा आग्रह करण्यात आलाय. आजचा चौथा दिवस. आजपासून असेच अठरा दिवस घरी राहूनच हे कोरोनाविरुद्धचं महायुद्ध आपल्या प्रत्येकाला करायचंय. 
घरी राहण्याची मिळालेली ही संधी आणि मिळालेल्या वेळेचा सदुपयोग आपण उत्तम साहित्यवाचनानं नक्कीच करु शकतो.
गेली १६ वर्षे ऐसी अक्षरेच्या माध्यमातून आम्ही सकस साहित्य वाचकांस देत आहोत. 
या सोशल मीडियाच्याद्वारे काही उत्तम साहित्य आम्ही आपणास सुचवू इच्छितो.

मंडळी, या कोरोनाशी युद्ध करण्याच्या निमित्तानं आठवलं ते महाभारतातलं कौरव-पांडवांमधील युद्ध. असंच अठरा दिवस चाललं.
' जिथे योगेश्वर कृष्ण आणि महाधनुर्धर अर्जुन आहेत तिथे विजयश्री नक्कीच ' या न्यायाने पांडव विजयी ठरले.

शिवाजी सावंत लिखित *युगंधर* वाचावयास घेतलं. सवयीनुसार पुस्तक चाळता चाळता *अर्जुन* या प्रकरणापासून नकळतच वाचन सुरू झालं. या युद्धाचा *अर्जुन* विजयी सेनानी. या प्रकरणात अर्जुनाच्या नजरेतून अनेक पात्रांची ओळख होते, विशेषकरून महातत्वज्ञानी, महायोगी, खरा स्थितप्रज्ञ अशा  श्रीकृष्णाची. अनेक घटना उलगडत जातात.
आवर्जून सांगावंसं वाटतं की, वाचकांनी या प्रकरणापासूनच वाचनास सुरुवात करावी, 
शिवाजी सावंत लिखित *युगंधरची.*

चला, आजपासून सुरू करुयात हा अठरा दिवसांचा वाचनमहायज्ञ.

पुन्हा भेटू उद्या, नव्या पुस्तकाची ओळख करून घेण्यासाठी.

बेलवलकर गृहनिर्माण, पुणे.
२८ मार्च २०२०

Tuesday, 7 July 2020

*मोगरा*

  • *मोगरा....*
अहाहा, व्वा. 
माठातल्या थंडगार, मोगऱ्याच्या अस्तित्वानं मन प्रसन्न करणाऱ्या पाण्याचा पहिला घोट पोटात गेल्यागेल्या माझ्या ओठावर येणारे हे उदगार.  
उन्हाळ्यात वाढणारा चटका, घामेजलेलं अंग, कोरड पडलेला  घसा आणि अशा लज्जतदार पाण्याचा मस्त घोट आणि सारा शिणवठा दूर.

कोपऱ्यावरच्या फुलाच्या दुकानावरुन जातांना मोगऱ्याच्या त्या धुंद वासात रेंगाळणारं मन आपोआप पावलांची गती रोखतं.

सिग्नल चौकात गाडीची काच खाली करून झटपट गजरेवाल्याकडून हाती असलेल्या नोटेच्या बदल्यात हिरवा बाण लागायच्या आत शिताफीनं येतील तेवढे गजरे घेण्याची धांदल, घेतलेले गजरे दबले जाऊ नये याची खबरदारी, घरी जाण्याची कोण घाई. श्शी सालं हे ट्राफिक. 

आणि घरी गेल्यावर अचानक तिला खूष करण्यातली गंमत ज्याला अनुभवता येते ना तो खरा रसिक प्रेमी.

एवढंसं मेलं नाजूकसं सफेद फूल,  त्याची मनाला किती पडे भूल ! बहराला येतं आणि लागते वसंताची चाहूल ! ! 

*मोगरा...* काय त्याचं कौतुक ! 
त्याची नावं विशेषणं तरी किती ! 
मल्लिका, नवमल्लिका,  अनंतमल्लिका, मदनबाण, प्रमोदिनी, जस्मिन, बेला, मालती....

एखादी, आपल्या भरगच्च केशसांभारात मोगऱ्याचा  गजरा माळलेली मोठया डौलात चालणारी सुंदरी झटकन शेजारून जाते आणि वाऱ्याची झुळूक तो सुगंधित सुवास खुळावून टाकतो.. 

तो पक्का डामरट निलाजरा *मोगरा....*

मोगऱ्या मोगऱ्या निलाजऱ्या, या चावट करणाऱ्या खोड्या तुझ्याच रे साऱ्या. एवढंसं कोवळं तुझं रुप बारकुल्या, खुशाल खुणावतं अन् वेडंपिसं करून दाखवतं वाकुल्या.
अशी काय रे तुझी हिंमत चुरगाळलं तर संपून जाशील.पण काय तुझी जादू ? जिथं असशील तिथं आम्हांला मर्दुमुकी विसरायला लावशील ! किती रे वात्रटपणा करशील, गुंगवून ठेवशील आणि वर गोड गोड पापं करायला लावशील ! !

मोगऱ्या चावट्या, तुला चेटुक करायला काहीच रे कसं वाटत नाही ! सुगंधानं घायाळ करतोस आणि स्वतः मात्र नामानिराळा राहतोस......

सहज सुचलं म्हणून तर नक्कीच पण या इवल्याश्या मोगऱ्यानं नेहमीच खुळावलंय म्हणूनही ...

पद्मनाभ हिंगे 

Tuesday, 19 March 2019



                       काय बरं अर्थ काढावा याचा ...

" एका गृहयोजनेच्या नव्यानेच बांधकाम चालू असलेल्या इमारती मधील काही सदनिकांचे काम मी  पाहात होतो. थोडासा नाराज होतो. तिथे रहायला येऊ पाहणाऱ्या काही व्यक्ती आपल्या कुटुंबासह तिथे होत्या. कांही तर तिथे डब्यात आणलेले खात होते. मात्र माझ्या ओळखीच्या असूनही मला कोणी ओळख देत नव्हते. जागेच्या मूळ मालकाची भेट न झाल्याने मी तेथून निघालो. काही क्षणातच माझ्या लक्षात आलं की आपण एका अपरिचित भागात आलोय. सातत्याने आपला मार्ग चुकतोय. परत फिरावे तर आला मार्ग वेगळाच दिसतो, असतो. छोट्या गल्लीबोळातून चालताचालता मुख्य रस्ता शोधूनही सापडत नाही. एका घराच्या दारात असलेल्या महिलेला विचारण्यासाठी पुढे जाऊ लागतो तर एक पुरुष मला  जरा खडसावूनच ' काय पाहिजे '  म्हणून विचारतो ! मी नम्रपणे म्हणतो,
'' मी रस्ता चुकलोय. मला सांगाल का ? ''
तो काहीच उत्तर देत नाही.
तेथील एका छोट्या मुलाला मी विचारतो, '' मुख्य रस्ता कुठे आहे ? '' तेंव्हा तो थोडे काही सांगून त्या रस्त्याकडे घेऊन जाऊ लागतो. पण पुन्हा तेच !
त्या वस्तीतून मला काही बाहेर पडता येत नाही. त्या वस्तीतील सर्व व्यवहार चालू असतात. पण माझ्याकडे कोणाचेच लक्ष नसते. कोणालाही माझ्याशी काहीही देणंघेणंही नसतं. एका क्षणी मला उगाचच असं वाटतं की कोणी माझ्यावर धावून आलं तर मी डोक्यावर हात जोडून एखाद्या  कपोलकल्पित महानायकासारखा  आकाशात उड्डाण करेन. अचानक मला जाणीव होते की आपण अशाप्रकारे मागेही  तीनचार वेळा अपरिचित वस्तीत गेलो होतो, जिथून बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नाही. पण कोणीही मला इजा किंवा अपाय वा हल्ला करत नाही.
आणि माझ्या लक्षात येतं की ह्या  विचारातून आपण बाहेर पडावं आणि अर्धवट झोपेतून मी जागा होतो."
ही कोणतीही कपोलकल्पित गूढकथा नाही.
तर सांगायचं काय की, खरंच गेल्या काही महिन्यात मला तीनचार वेळा तरी असें अपरिचित वस्तीत आणि तीही मी राहात असलेल्या शहरातच मी परिचित रस्ता शोधत असल्याचे स्वप्न पडते आहे. प्रत्येक स्वप्नातील वस्ती मात्र एकदम स्वच्छ असते.
एरवी मी ही स्वप्नं विसरूनही गेलो असतो, पण काल पहाटे हे स्वप्न पुन्हा पडले. इतर संदर्भ वेगळे असतील पण परिस्थिती मात्र तीच, एकच समान धागा. तो म्हणजे, ' अनोळखी भागात, अपरिचित वस्तीत गेल्याचीच स्वप्ने ! '
मी हिला, माझ्या पत्नीलाही हे स्वप्न सांगितले.
याचा काय अर्थ असावा ते कोणाला विचारावे किंवा शोधून काढावे असें मला वाटू लागले आहे.
हे स्वप्न मला काही सुचवू पाहतंय का ?
माझ्या आतून मला काही सूचना मिळतेय का ?
मी येणाऱ्या काळात असा गोंधळून कोठे तरी अडकणार आहे का ?
मी सद्यस्थितीत तिथल्या तिथेच घुटमळतोय का ?
असें एक ना अनेक प्रश्न माझ्यासमोर ठाण मांडून उभे राहात आहेत. अर्थातच ही स्वप्नंच  असल्याने मला फारसे विचलित झाल्याचेही वाटत नाही, भीती नाही अथवा दडपणसुध्दा आलेले नाही. माझे कुतूहल मात्र जागे झाले आहे. मी काही फारसा आध्यात्मिक नाही किंवा मानसशास्त्राचा अभ्यासक, चिकित्सक नाही.
माझ्या मित्रांपैकी कोणाला अशा स्वप्न अभ्यासात स्वारस्य असेल,  कोणी जर मला याचा काही अर्थ असल्याचे सांगू शकले तर चालेल मला जाणून घ्यायला. पण चेष्टा नको. खरंच.
अर्थात कोणाला कांही गंभीर धोकादायक असा अर्थ सापडला आणि त्याला तो सांगावासा वाटला तर मला कसे सांगावे,  असा विचार न करता, अथवा माझी काळजी न करता त्यानी जरूर सांगावे. मला कांही त्याचं दडपण येणार नाही. किंवा मी गोंधळूनही जाणार नाही. इतका कांही मी कमकुवत मनाचा नाही.
हे जे वर लिहिलंय ते मी खरंच स्वप्नांत तीन चार वेळा तरी पाह्यलंय.

पद्मनाभ हिंगे
१९ मार्च २०१९