Friday, 10 July 2020

पुस्तक परिचय

ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी
 
दिवस ३ रा

 " संसारामधि ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको "

" खरंच, वाचकहो! भटकायला तरी कुठं जाणार ? हितचिंतक वाटेत भेटले तर ते चहासाठी हॉटेलात ओढतात आणि ते किमान चौघं-पाचजण असल्यामुळे मला आत ओढू शकतात. त्यामुळे आपलं घरी राहिलेलं बरं ! ' संसारामधि ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको ' हा लहानपणीच अनंतफंदीनं मारलेला फटका मला आजतागायत आठवतो आहे ! "

मंडळी, या लॉकडाऊनमध्ये तुम्ही घरीच बसा हा सल्ला ऐकून तुमचे कान किटले असतील ना ! पण उपरोक्त अनंतफंदीनं मारलेल्या फटक्याची आठवण करून दिली आहे ती ' मी, वाचक आणि हितचिंतक ' या जयवंत दळवी यांच्या ' उपहास कथा ' या कथासंग्रहातल्या या कथेनं.

तुमचा स्वभाव कसा आहे ? 
भिडस्त की बेधडक ? 
बेधडक असेल तर, भिडस्त स्वभावाच्या मंडळींची गंमत कशी होते ते वाचायला तुम्हांला आवडेल. 
आणि भिडस्त स्वभाव असलेल्यांनी आपली कशी कुतरओढ होते ते जाणून, बघा जमतंय का स्वभाव बदलायला ते ! 

जयवंत दळवी, या सिद्धहस्त साहित्यिकाबद्दल आम्ही काय सांगावं ? पुरुष, सूर्यास्त या आणि अशी अनेक दमदार नाटकांचे लेखन दळवी यांनी केलंय.  
गंभीर, विनोदी कथा, कादंबऱ्या असं खूप काही सकस दमदार,  विचार करायला लावणारं विपुल लेखन करणारा हा बुद्धिमान लेखक.

विनोद आपल्याला हसवतो, ताजंतवानं ठेवतो. अश्याच दळवी यांच्या 'उपहास कथा' या संग्रहातील कथा तुम्हांला नक्कीच आवडतील.

बेलवलकर गृहनिर्माण, पुणे 
३० मार्च २०२०

No comments:

Post a Comment