ऐसीअक्षरे : महायुद्ध कोरोनाशी
*दिवस* *२ रा*
कधी तरी अशीही वेळ येते की चार भिंतींच्या बाहेर येणेच शक्य होत नाही. आपण खडखडीत असतो, पण बाहेर पडता येत नाही. कधी भूतो न भविष्यति अशी तुफानी पर्जन्यवृष्टी होते आणि आपण अडकून पडतो. आपण विचार करतो एखादा दिवस करु या सहन, पण पाऊस थांबण्याचं नावच घेत नाही.
चार दिवस उलटून गेले. मोबाईलवर व्हॉट्सअप, फेसबुक इत्यादी सोशल मीडियाचा कंटाळा आलाय. टीव्हीवर त्याच त्याच मालिकांचे पुनःप्रसारण आणि सतराशे साठ वाहिन्यांवरील त्याच त्या कोरोनाच्या बातम्या ऐकून कंटाळा आलाय. अचानक पुस्तकांच्या कपाटाकडे पावलं वळली आणि पुस्तकं चाळू लागलो....
...... त्या क्रूर औरंग्याच्या मगरमिठीतून आणि फुलादखानाचा विळखा तोडून आपली सुटका कशी करून घ्यायची या विचारांत शिवाजीमहाराजांची मानसिक अवस्था किती बिकट झाली असेल ?
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित *राजा* *शिवछत्रपती* पुस्तकातील *महाराज* *आणि* *औरंगजेब* हे प्रकरण मी, महाराज यातून बाहेर पडले हा इतिहास माहीत असतांनासुद्धा अत्यंत औत्सुक्याने, अधीरपणे, कमालीच्या कुतुहलाने वाचू लागलो. किती वेळा वाचलं असेल ?
दिवसांमागून दिवस जात होते. चार भक्कम भिंतींच्या कडेकोट बंदोबस्तात राजे अडकले होते. बाहेर रक्तातल्या प्रत्येक थेंबात महाभयंकर विषाणू ठासून भरलेल्या क्रूरकर्मा औरंग्याचे निष्ठूर नीच पहारेकरी. बाहेर पाय टाकताच असंख्य जीवघेणी मनुष्यरुपातली श्वापदे.
' औरंगजेब आपला प्राण घ्यावयास टपला आहे; केव्हा तरी अचानक झडप घालून तो कोणत्याही भयंकर रीतीने ठार मारून टाकील याची जाणीव महाराजांना होती .....'
अत्यंत *संयमाने* मनांतला एकमेव *संकल्प* पूर्णत्वाला न्यायचाय या उद्देशाने महाराज त्या कडेकोट चार भिंतीत संधीची वाट पहात होते ...
वाचतांना अंगावर रोमांच उभे राहात होते आणि अनेक दिवसांच्या या कठीण प्रसंगातून महाराज सहीसलामत बाहेर पडले, हे वाचतांना तुमचा कंटाळा कुठल्याकुठे पळून जाईल आणि शिवाजीमहाराज तुम्हांला बाक्या-जीवघेण्या संकटातून बाहेर पडण्याची कशी प्रेरणा देतात त्याचा अनुभव घेता येईल ..
हा सुटकेचा थरारच नव्हे तर अवघे शिवचरित्रच तुम्हीही जरूर वाचण्यासाठी हाती घ्या, ब.मो.पुरंदरे लिखित, *राजा* *शिवछत्रपती*
बेलवलकर गृहनिर्माण, पुणे
२९ मार्च २०२०
No comments:
Post a Comment