विरह जरी तो असो गोडसा
ती दूर असते. मी एकांतात एकटा होतो. तिचेच विचार, तिचीच गोड छबी, कायमचीच असली तरी विरह तो विरहच. ती येणारच असते. मला एकटं विचारात गढलेलं पाहून त्या चंद्राला का उगाच माझ्या साथसोबतीला यावं वाटलं? त्याला कसं कळलं, मी तिच्याच विचारात आहे म्हणून?
विचार तिचा मनी आला
तो चंद्रच उतरून आला!
विचारातच धुंद झालो मी
हा उगाच का तळमळलेला
तू का रे उतरून आला?
का गरज वाटली त्याला
यावे माझ्या मदतीला
तो चंद्रच उतरून आला!
निवांत अशा रातीला
आठविता मी तिजला
तो चंद्रच उतरून आला!
ते क्षण मधुर सोबतीचे
जागवी मम कवी मनाला
तो चंद्रच उतरून आला!
जरी विरह असा मज जाचे
निश्चिती पुरती मजला
येईल लवकरी ती भेटीला!
ती कवितेत माझ्या येता
का गरज तुझी रे मजला
हट्टाने का उतरून आला!
मनपटलावरी दर्शन 'ती' चे
तो मधुकण पाहता टिपलेला
तो नाराज मज दिसलेला!
का वाटले कवितेत मी घेईन
म्हणूनच का रे आला
ती हृदयात रे नित्य वस्तीला
उपमान ना तव मी योजेन
सह उपमेया मम राणीला
तू उगाच का उतरून आला!
ती हळुच गाली हसली
जळफळाट त्याचा झाला
जा रे, गरज तुझी आकाशाला!
तिच्या गाली लाली चढली
गडबडून हा पुरता गेला
म्हटले तरी का थांबलेला!
'ही कोण सुंदरी एवढी
खिजवून राहिली मजला'
तो प्रश्न विचारी मजला!
दुर्लक्षिले मी त्याला पुरते
मी लक्ष देऊ कशाला
तो गांगरूनीया गेला!
ती येईल लवकर जवळी
म्हटले, कडकडून भेटायाला
तो कोमेजुनिया गेला!
संपता प्रतीक्षा माझी
का विचारू मग मी तुजला
हिरमोडच त्याचा झाला!
आता काय तुझी रे उपमा
कामाची नाही मजला
तो ढगाआड निघुनी गेला
तो चंद्रच निघुनी गेला!
तरी खोड न त्याची जिरलेली
भाळी कोर लाल होउनी बसला
ठसा उमटवुनी राहीला!
पद्मनाभ स्नेहप्रभा प्रभाकर हिंगे
पुणे
मिती : माघ शुद्ध पंचमी शके १९४४.
No comments:
Post a Comment