Tuesday, 28 July 2020

पुस्तक परिचय २१

ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद
   
     ' तेवढ्यात गर्दीतून एक अगदी म्हाताऱ्या आजी धावत दादांकडे आल्या आणि काही कळायच्या आत त्या दादांच्या पाया पडू लागल्या. दादा संकोचून मागे सरले. तर त्या म्हणाल्या, "ज्ञानेश्वरा, तू खरंच माऊली आहेस.मला साक्षात माउलीचं दर्शन झालं. माऊली जशी गाथा सांगते, तशीच तू गाथा सांगितलीस.माझी पोरं-नातवंडं शेती करायची म्हणू लागल्यावर आम्हांला वाटलं, काय झालं या पोरांना ? शेतीमधी काय ठेवलं आहे ? पण तुझं बोलणं ऐकल्यावर पटलं मला."
     दादा म्हणजे श्री.ज्ञानेश्वर निवृत्ती बोडके, राहणार, बोडकेवाडी, तालुका मुळशी, जवळची खूण, पुणे परिसराला 'आय टी हब' म्हणून ओळख मिळवून देणारं 'हिंजवडी' येथील आय टी कंपन्यांच्या टोलेजंग इमारतींच्या गर्दीत अंग चोरून बसलेली वाडी, जि.पुणे.
     आपल्या अथक प्रयत्नानं  शेतीतही आपण 'नंदनवन' फुलवू शकतो, असा दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणारा,  अवघी एक दोन एकर शेती असलेला शेतकरी.
     ऐसी अक्षरेच्या एक हितचिंतक, वाचक, अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आणि स्वतः एक सिद्धहस्त लेखिका असलेल्या, शिवशाहीर बाबासाहेबाना पुरंदरे यांच्या स्नुषा , डॉ.चित्रलेखा पुरंदरे यांचे नुकतेच प्रकाशित झालेले एका एकराची अभिनव ज्ञानेश्वरी.
      या पुस्तकाचा नायक म्हणजे हे ज्ञानेश्वर बोडके. 
     हे पुस्तक वाचल्यावर ओठांवर पहिली प्रतिक्रिया आली, ती म्हणजे, असाही एक मुळशी पँटर्न! असतोच.
     आपल्या देशाला कृषिप्रधान देश अशी ओळख आहे. पूर्वी  'उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी ' हाच विचार दृढ होता. काळाच्या प्रवाहात हे समीकरण बदलत गेलं आणि जे कनिष्ठ होतं ते 'उत्तम' झालं. म्हणजे उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती, असं झालं.
     घरची शेती. परंतु ... हा परंतु म्हणजे अत्यंत बेभरवशाचा शेतीउद्योग झाल्यामुळे पोटासाठी दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरीसाठी जावं लागणं!  घरांत सात खाती तोंडं. आई वडील आणि चार बहिणींच्या मधला ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरला शिकण्याची ओढ. मिळेल त्या वेळेत पडेल ते काम करीत ज्ञानेश्वर शिकत राहिला तो जिद्दी आईच्या पाठिंब्यावर! दैनंदिन दहा किलोमीटरहून अधिक पायपीट करणारा ज्ञानेश्वर दहावीला ८३% गुण मिळवून उत्तीर्ण झाला. पुढे रोज वीस वीस किलोमीटरचा सायकलप्रवास करीत नोकरीत टायपिंगबरोबर पडेल ते काम करीत ज्ञानेश्वरने इंटेरियर डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. 
     लग्न झालं. ज्ञानेश्वरला मात्र आपलं गहाण पडलेलं शेत खुणावत होतं. त्याचा निर्णय झाला आणि आई वडलांचा विरोध पत्करून ज्ञानेश्वरने नोकरीला रामराम केला. साठलेल्या पैशांतून सावकाराकडे गहाण पडलेला एक एकराचा तुकडा त्यानं सोडवला.  
     वाचकमित्रांनो, सर्वच कांही सांगायचं तर तुम्ही हे पुस्तक वाचणार कधी ? मात्र या पुस्तकातल्या कांही ठळक घटनांची माहिती देणारं एखादं  वाक्य किंवा थोडाफार मजकूर तुमच्यासमोर ठेवतो. 
    एखादं ध्येय, त्याच्या पूर्तीसाठी शिक्षण, परिश्रम, कष्टाची लाज न ठेवता प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेत प्रस्ताव तयार करणे. बँकेत पूर्ण तयारीनिशी सादर करुन दहा बारा लाखांचे कर्ज मिळवणं  आणि अवघ्या चौदा महिन्यांत पूर्ण कर्जफेड करीत, ' एका वर्षातच कर्ज फेडणारा पहिलाच शेतकरी ग्राहक,' अशी बँकेत ठळक नोंद करुन ठेवणारा प्रेरणादायी, प्रामाणिक, कष्टाळू शेतकरी म्हणजे ज्ञानेश्वर बोडके.
     त्यांच्या पुढील वाटचालीची यशोगाथा वाचतांना, मनात विचार आला की, देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या, खेळाडू, कलाकार, किर्तीमान नेता यांच्या यशोगाथा सारेच वाचतात. अशा शेतकऱ्याची यशोगाथा हीदेखील प्रेरणादायीच असते आणि ती वाचायलाच हवी. लेखिकेने आपल्या मनोगतात म्हटलंच आहे, ' आपण शेतकरी असाल तर वाचलीच पाहिजे आणि शेतकरी नसाल तरीही वाचायलाच हवी, अशी ही कहाणी.' 
     
बेलवलकर गृहनिर्माण
१७ एप्रिल २०२०

No comments:

Post a Comment