Wednesday, 29 July 2020

पुस्तक परिचय २२

ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद

      कथावाचन हा आमचा आवडता विषय. त्यात ती कथा विनोदी असेल, गावाकडची असेल तर आम्ही डोळे टवकारुन बसतो. द.मा.मिरासदार, गंगाधर गाडगीळ, शंकर पाटील, वसंत सबनीस हे लेखक तसे आमच्यासाठी अत्यावडीचे! .. अति आवडीचे! 
     दमांची ' व्यंकूची शिकवणी ' जेव्हा पहिल्यांदा वाचली ना,' अय हव्वा, लय भारी ' असे शब्द आपोआप तोंडातून बाहेर पडले, अगदी कळीकाळाचं भान न राहता. मग काय, पारायणं सोडा वो, कैक वेळा वाचली. तेव्हापासूनच की काय तंबाखू खाणं आम्ही विसरूनच गेलो. म्हणजे त्या खऱ्याखुऱ्या तंबाखूत जी किक बसायची, ती तर या व्यंकूच्या शिकवणीपुढं कायच न्हाय! असंही आम्ही आमच्या कैक मित्रांना सांगितल्याचं आठवतंय. 
     गावरान बाज घिउनशान आलेल्या शंकर पाटलांनी तर आम्हांला त्यांच्या जणू  'शाळे'तनंच फिरवून आणलं. आम्ही जेव्हा शाळेत होतो ना, तेव्हा आमच्या वर्गातल्या सगळ्या व्रात्य मुलांच्या  खोड्यांची, मास्तरांबरोबर बोलताना वागताना त्यांनी केलेल्या इरसालपणाची आठवण तर झालीच, पण त्यातले  कांही व्रात्य मित्र अंगठे धरून उभे असल्याचेही दिसले. 
     ही सगळी विनोदी लेखक मंडळी मुळातच खूप व्रात्य, बेरकी असली पाहिजेत, असंच आम्हांला वाटतं. कारण, कथा सांगता सांगता ही मंडळी एखादा चित्रपट पाहावा अशी कथा समोर मांडतात ना की, सारं काही समोर घडतंय की काय असंच वाटावं! 
     या शंकर पाटलांच्या 'शाळेत' ल्या एका वर्गातले कांही डायलॉग्ज तुम्हांला ऐकवतोच, त्याशिवाय आम्हांला राहवणारच नाही.
     " बस, खाली बस! दुसरं कोण वाचतंया? तू वाच रं. तू वाच .."
      असं म्हणून एक गबाळं पोरगं त्यांनी उठवलं. ते पानं चाळाय लागलं तोच एक धाकटं पोरगं मोठ्यानं म्हणालं, 
     "मास्तssर, ह्यो गण्या बगा माझ्या चड्डीत हात घालतोयाss! "....
      "कुठं गेलतास इतका वेळ? "
      "म्हशीला घेऊन गेलतो."
      "आणि ही फुंकणी कशाला आणलीयास? "
       "आईनं लौकर वाडलं न्हाई म्हंताना तिची फुकणी घेऊन आलोया."
     मध्येच सगळी पोरं एकदम हसू लागली. मास्तर गण्याला मारायचे थांबून म्हणाले, "का रं, का हसता? "
      मग हळूच एक पोरगं म्हणालं, "मास्तर, गण्या चड्डीत मुतला बगा."......
        'धिंड' नावाची अशीच एका इरसाल दारुड्याची कथा, शंकर पाटील यांनी मोठया खुमासदार पद्धतीनं लिहिली आहे.
        शंकर पाटील हे  एकदम पारदर्शी लेखक. कथा, कादंबरी, वगनाट्ये, चित्रपट कथा, स्फुटलेखन असं खूप लिखाण त्यांनी करुन ठेवलंय. आत्ता शंकर पाटील यांचा वळीव हा कथासंग्रह पुन्हा एकदा वाचायला काढलाय.
     खरंच ना, या लॉकडाऊन  मध्ये कपाटात पुष्कळ पुस्तकं असल्यामुळं दिवस कसा झटकन निघून जातो ना, कळतच नाही.
     बाकी मित्रांनो तुम्ही काय म्हणताय? घरांत आहात ना? सोशल डिस्टंसिंग पाळताय ना? नाक तोंड झाकून घेताय ना? मग कसली काळजी! जातील पटकन निघून हेही लॉकडाऊनचे दिवस.
      खूप शुभेच्छा ..
  
बेलवलकर गृहनिर्माण
१८ एप्रिल २०२०

No comments:

Post a Comment