Saturday, 25 July 2020

पुस्तक परिचय १८

ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी

दिवस १८ वा

    सारं जग आज कोरोना नावाच्या विषाणूच्या महाभयंकर उद्रेकानं भीषण संकटात सापडलंय. या विषाणूनं श्रीमंत गरीब, सुष्ट दुष्ट, आस्तिक नास्तिक, गोरा काळा, स्त्री पुरुष असा कोणताही भेद न ठेवता सर्वांना एकाच तागडीत टाकलंय.
     आज पंतप्रधानांनी जाहीर केलेला पहिला एकवीस दिवसांचा लॉकडाऊन संपतोय. कोरोनाशी चालू असलेलं महायुद्ध लवकरात लवकर संपावं ही प्रत्येकाचीच इच्छा आहे. 
    सध्या आपण रोजच आपापल्यापरीने आपापल्या देवाजवळ प्रार्थना करीत आहोत. अशा या अत्यंत बिकट काळात आठवतं ते, संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण मानवजातीसाठी मागितलेलं पसायदान..
      खरंतर प्रत्येक मराठी माणसानं ज्ञानेश्वरी एकदा तरी वाचावी. किमान, 
एकतरी ओवी अनुभवावी. 
      ज्ञानोबामाऊलीच्या गणेशाला मूर्तीरुप नाही. तर, अकार चरणयुगुल। उकार उदर विशाल। मकार महामंडल। मस्तकाकारें॥ हे तीन्ही एकवटले। तेथ शब्दब्रह्म कवळले।  ते मियां श्रीगुरुकृपा नमिलें। आदिबीज॥(अ.१, ज्ञाने.) या ओव्यांद्वारे  शब्दब्रह्मरुपी गणेशाचे स्मरण करावे.
      ऐसी अक्षरेचे संस्थापक कै.शरच्चंद्र बेलवलकर यांनी सध्याच्या पिढीला सहज समजेल अशा भाषेत ज्ञानेश्वरीतल्या तेरा अध्यायांतील प्रत्येक ओवीचं सुलभीकरण केलं होतं. काही कारणानं ते पूर्ण होऊ शकलं नाही. ज्ञानेश्वरीतल्या ६ व्या अध्यायातील, *माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातेंहि पैजासी जिंकें। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन॥* या १४व्या ओवीतील ध्येय डोळ्यांसमोर ठेवूनच ऐसी अक्षरेचा उपक्रम सुरू झाला.
       ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या अखेरीस माउलींनी आपल्या सद्गुरुंना अत्यंत प्रासादिक शब्दांत पसायदान मागितलं. पसायदान म्हणजे प्रसाद मागितला. प्रत्येक मराठी व्यक्तीनं हे पसायदान वाचावं, समजून घ्यावं, जे फारसं अवघड नाही, स्मरणात ठेवावं. शक्य असल्यास घरीं आपल्या सर्व कुटुंबियांसमवेत आवर्जून म्हणावं. त्यातल्या अर्थावर मन केंद्रित करावं. 
    
आतां विश्वात्मकें देवे। येणें  वाग्यज्ञे तोषावें।तोषोनि मज द्यावे। पसायदान हें॥ जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती  वाढो। भूतां परस्परे पडो। मैत्र जीवाचें॥ दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्मसूर्ये पाहो। जो जे वांछील तो ते लाहो। प्राणिजात॥ वर्षत सकळ मंगळी।ईश्वरनिष्ठांची मांदियाळी। अनवरत भूमंडळी। भेटतु भूतां॥ चलां कल्पतरुंचे आरव। चेतनाचिंतामणीचें गांव। बोलते जे अर्णव। पीयूषाचे॥ चंद्रमे जे अलांछन। मार्तंड जे तापहीन। ते सर्वांही सदा सज्जन। सोयरे होतु॥ किंबहुना सर्व सुखी। पूर्ण होऊनि तिहीं लोकीं। भजिजो आदिपुरुखी ।अखंडित॥ आणि ग्रंथोपजीविये।विशेषी लोकी इये। दृष्टादृष्टविजये। होआवें जी॥येथ म्हणे श्रीविश्वेशरावो। हा होईल दानपसावो। येणे वरे ज्ञानदेवो। सुखिया जाला॥
 
     मित्रांनो, महाभारताचे युद्ध अठरा दिवस चालले. याच युद्धप्रसंगी गळाठून गेलेल्या अर्जुनाला भगवंतांनी गीता सांगितली, आणि अर्जुनाने महायुद्धाला सामोरं जात विजय मिळवला. 
       या भगवतगीतेचे अध्याय अठरा. ज्ञानेश्वरीचेही अध्याय अठरा. ऐसी अक्षरेच्या या अठरा दिवसांच्या महायज्ञाला अठरा दिवस आज पूर्ण झाले. अजून असंख्य पुस्तकं सुचवता येतील.   
     या यज्ञाची सांगता करतांना हात जोडोनी नम्र विनंती, दर्जेदार साहित्य वाचन करा. कुणाच्याही संगतीत असतांना चार फुटांचे अंतर ठेवा. वारंवार सांगितलेल्या सूचना पाळा. स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या.
    तुम्हां सर्वांसाठी मनोमन प्रार्थना, " घरीं आहातच, म्हणून तुमचं, तुमच्या कुटुंबियांचं शरीरस्वास्थ्य, मन:स्वास्थ्य सदैव उत्तमच राहो."
 
बेलवलकर गृहनिर्माण
॥ मिती चैत्र कृ.७ शके १९४२॥ 
 १४ एप्रिल २०२०

( ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून  आनंद -- उद्यापासून ...)

No comments:

Post a Comment