ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी
दिवस ९ वा
कोणतंही ग्रंथप्रदर्शन असो, त्या प्रदर्शनात दोन तीनवेळा जाऊन एखादं का होईना पुस्तक खरेदी करायचंच हा आमच्या वाचनप्रेमी नावाच्या कुटुंबाचा एक कुळाचार. या प्रदर्शनात एक विभाग असतो, जिथे धार्मिक, वेद, उपनिषदे, पुराणे, आध्यात्मिक, ज्योतिष, स्तोत्रे, संकटावर मात करण्यासाठी मंत्रशक्तीने करावयाचे उपाय अशी अनेक पुस्तके मांडून ठेवलेली असतात. या पुस्तकांची विक्रीसुद्धा खूप असावी. अशा पुस्तकांचा सुद्धा एक मोठा वाचकवर्ग नक्की आहे.
आपण वाचनासाठी पुस्तकं निवडतो, ती प्रामुख्याने कथा, कादंबऱ्या, ऐतिहासिक, चरित्रे इत्यादी. या विज्ञानयुगात नव्या पिढीला आपल्या संस्कृतीतील पौराणिक, वैदिक प्रकारच्या कोणत्याही विषयात फारसं स्वारस्य दिसत नाही. एखाद्या पाश्चात्य अभ्यासकानं आपल्या प्राचीन अभ्यासकांनी लिहून ठेवलेल्या ज्ञानाबद्दल गौरवोद्गार काढले की आपली छाती अभिमानानं फुलते. मात्र या विषयांवर अभ्यास करायला फारशी उत्सुकता दिसून येत नाही. कारण हेही असू शकेल, की या अभ्यासाचा उपयोग पैसे मिळवण्यासाठी फारसा होत नसावा ही भीती. असो.
साधारण तीस वर्षांपूर्वी पंडित मीमांसातीर्थ श्रीपादशास्त्री किंजवडेकर यांनी लिहिलेलं गायत्री विज्ञान आणि उपासना हे गायत्री मंत्रावर असलेलं एक अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तक विकत घेतलं होतं.
या पुस्तकात षटचक्रे, आपलेशरीर, मन आणि मंत्र, उपासना, धारणा, ध्यान व जप यासह अनेक विषय सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत.
देवावर विश्वास नसलेले कांही विद्वज्जन, पंचमुखी गायत्रीचं चित्र बघितलं की, लग्गेच, 'असं कुठं पाच तोंडं असलेलं दैवत असतं होय ? शक्यच नाही ' असं म्हणत या विषयाची खिल्ली उडवतात. पण त्यामागे नेमकं काय चिंतन असतं ते जाणून घ्यायची त्यांची तयारी-इच्छा नसते.
मुक्ताविद्रुमहेमनीलधवलच्छायैर्मुखैस्त्र्यक्षणैर्युक्तामिन्दुनिबद्धरत्नमुकुटांतत्वार्थवर्णात्मिकाम्।
हे गायत्रीचं ध्यानरुप अभ्यासण्याची त्यांची इच्छा नसते. मग कुठं त्यांच्याशी वाद घालत वेळ घालवायचा ?
त्यांची विचार करण्याची आपली आपली पद्धत असेल तर असू देत त्यांच्याचपाशी.
गायत्री मंत्राचा अर्थ आपण जाणून घेऊ या.
' प्रणवोत्पन्न पृथ्वी, अंतरिक्ष, व स्वर्ग यांच्याही पलिकडे असलेल्या दिव्य सूर्याच्या पापदाहक तेजाचे आम्ही ध्यान करतो, जो सूर्य आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो ' ..
ही प्रार्थना केवळ स्वतःसाठीच नाही तर सर्वांसाठी आहे.
गायत्री विज्ञान हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. एवढ्याशा विवेचनात तो समजणे अवघड आहे.
आपले माजी राष्ट्रपती डॉ.राधाकृष्णन हे मोठे विद्वान तत्ववेत्ता होते. गायत्रीचा महिमा सांगताना त्यांनी म्हटलंय, ' गायत्री ही मानवतेला दिलेली महान देणगी आहे.यथार्थ ज्ञानाचा स्रोत तुमच्या मनांत केवळ गायत्रीने होऊ शकेल. गायत्रीची आराधना करा की, भारतीय तत्वज्ञानाच्या प्रकाशाने तुम्ही सारी मानवता उजळून काढू शकाल. शाश्वत तत्वज्ञानाचे अक्षय्य तेवणारे नंदादीप तुम्ही मानवतेच्या मनोमंदिरात लावू शकाल.'
गायत्री विज्ञान आणि उपासना हे किंजवडेकरशास्त्री लिखित पुस्तक जरूर वाचा.
मा.पंतप्रधान मोदी यांनी आज नऊ वाजता दिवे लावण्याची का विनंती केली असेल, याचाही खुलासा कदाचित तुम्हांला होईल.
बेलवलकर गृहनिर्माण
५ एप्रिल २०२०
No comments:
Post a Comment