Saturday, 18 July 2020

पुस्तक परिचय ११

ऐसी अक्षरे: महायुद्ध कोरोनाशी

दिवस ११ वा

   ' पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी या राजकीय रमीचा डाव खेळतात आणि त्या नेहमीच जिंकतात. पत्ते बरोबर नेमके कसे सरकवायचे, सिक्वेन्स अचूक कसा जुळवायचा यांत त्यांचा हातखंडा आहे.' 
    हे आम्ही सांगत नाही, जरा वाचा पुढे ..
    राजकारणात ज्यांना स्वारस्य आहे, त्यांची नजर या पहिल्याच वाक्यावर पडली की, पोटात लपलेले त्यांच्या आवडत्या विषयाचे अनेक कावळे कावकाव करु लागतील ! 
    ' महाराष्ट्रातील ४८ खासदारांपैकी चौदा खासदारांनी गेल्या पाच वर्षांत लोकसभेत एक शब्दही उच्चारला नाही.' 
   ' मुख्यमंत्री अंतुले यांनी विधानसभेत आपण पंतप्रधानांना राजीनामा सादर केल्याचे जाहीर करताच लागलीच दुसऱ्या दिवशी भराभरा विमाने पकडून मंत्री दिल्लीत येऊन थडकले, एका श्रीमंत आमदाराने कांही मंत्र्यांची विमानाची तिकिटे काढली होती, असे म्हणतात......' 
     महाराष्ट्र टाइम्सचे विशेष प्रतिनिधी म्हणून १९७८- ८९ या काळात ज्येष्ठ पत्रकार *श्री.अशोक जैन* दिल्लीत काम पाहात होते. त्या काळातले त्यांचे अनेक अनुभव त्यांनी  *राजधानीतून* या आपल्या पुस्तकात लिहिले आहेत. या पुस्तकाबद्दल ते लिहितात की, ' हे पुस्तक म्हणजे केवळ बहारदार किश्शांची पोतडी मानली जाऊ नये, तर त्यातून डोकावणाऱ्या इतिहासाचा अन्वयार्थ वाचकांनी लावल्यास त्यांना आपोआपच सुसंगती लागेल.' 
    ऐसी अक्षरेच्या वृत्तपत्रातील साहित्य विशेषांकासाठी आम्ही अशा साहित्याच्या शोधात असतांना हे पुस्तक हाती आलं होतं. हा विशेषांक तत्कालीन मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते प्रकाशित झाला होता.
    पुस्तक वाचतांना काही किश्शांना आधीच कंस टाकून ठेवले असल्याने, अगदी सगळेच नाही, तरी कांही किश्श्यातली नेमकी वाक्ये तुमच्याकडे पोहोचवतो. म्हणजे औत्सुक्यापोटी लॉकडाऊन उठताच पुस्तक घेण्यासाठी आपण नक्कीच पुस्तकालय किंवा ग्रंथालय गाठाल अशी तजवीजच या वाक्यांद्वारे आम्ही करुन ठेवत आहोत. 
     वाचा तर मग ...
     ' नेत्यांच्या दिल्लीच्या हवेत एक दांभिकपणाही भरलेला आहे. माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांच्या 'इनसायडर' (अंत:स्थ) या कादंबरीतील एक वाक्य मला फार आवडतं. ते म्हणजे - 'दिल्लीत चेहरे भेटतच नाहीत, भेटतात ते सारे मुखवटे.' 

      ' सुंदरा मनामधे भरली, 
      जरा नाही ठरली, 
      हवेलीत शिरली, 
      मोत्याचा भांग ....' 
   राजधानीतील मावळणकर सभागृहात खणखणीत आवाज घुमला. रामजोशींची ही अजरामर लावणी गात होते ' शाहीर ' वसंत साठे (म्हणजे केंद्रीय रसायन खात्याचे मंत्री). श्रोत्यांमध्ये खुद्द पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, केंद्रीय मंत्री आणि खासदार मंडळी होती ....' 

    ' वाजपेयी यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेताच केलेले भाषण हा त्यांच्या अमोघ वक्तृत्वाचा उत्कृष्ट नमुना होता. ' एक स्वप्न भंगले म्हणून दुसरे स्वप्नच पाहायचे नाही का ? ' असा सवाल करतांना त्यांच्या वाणीतील आशावादाचे आणि ' रस्ता खूप लांब आहे, दूरचा आहे कठीण आहे. तरीही चलते रहो, चलते रहो ' असे आवाहन करतांना त्यांच्यातील आश्वासकतेचे दर्शन घडले.' 

     मंडळी, या पुस्तकात अनेक घटना, घडामोडी, अनेक बड्या नेत्यांचे वेगवेगळे किस्से जैन यांनी उत्तम पद्धतीने लिहिले आहेत. 
    या ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी सदरात विविध विषयांवरील पुस्तकांची ओळख आम्ही करुन देत आहोत. गेल्या दहाबारा दिवसांत लॉकडाऊनमुळे पृथ्वीवरील प्रदूषण जसं झपाट्यानं कमी होऊन स्वच्छ वातावरणाचा प्रभाव वाढलाय, तद्वत असंख्य पोस्ट्सचा कंटाळा येईपर्यंत फाफटपसारा वाढवून ठेवणाऱ्या मीडिया आणि तत्सम माध्यमांमुळे झालेलं सांस्कृतिक गोष्टींवरील प्रदूषण या वाचन सवयीमुळे नक्की कमी होईल असा आम्हांला विश्वास वाटतो.
       
बेलवलकर गृहनिर्माण

 ७ एप्रिल २०२०

No comments:

Post a Comment