Saturday, 15 August 2020

पुस्तक परिचय ३९

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


     रॉय किणीकर, तसं साहित्य क्षेत्रात, नव्या वाचकवृंदात अभावानंच माहीत असलेलं नाव. ऐसी अक्षरेच्या मे-जून २०१२ मध्ये प्रकाशित झालेल्या अंकाच्या अतिथी संपादक म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी आपला सहभाग नोंदवला होता. त्यावेळी त्यांनी रॉय किणीकर यांच्या उत्तररात्र या काव्यसंग्रहातील काही छोट्या कविता घेण्याविषयी सुचविले होते. 

      उत्तररात्र हे छोटे पुस्तक जेंव्हा हाती आले, त्यातल्या सर्वच कविता अगदी चार चार ओळींच्याच दिसल्या. 


    शहाण्या शब्दांनो हात जोडतो आता 

    कोषात जाउनी झोपा मारीत बाता 

    रस रूप गंध अन् स्पर्श पाहुणे आले 

    घर माझे नाही, त्यांचे आता झाले ॥ 


     एकेक कडव्यातल्या या कविता वाचताना, या अर्थपूर्ण असल्याचे लक्षात आले. वाचकाला सहज समजू शकणाऱ्या या रुबाया, वाचता वाचता ओठांवर ती सहज सुरेल लय घेऊनच येऊ लागल्या.


    हे असेच लिहिणे, असेच असते गाणे 

    जरि नसले अश्रू असेच आहे रडणे 

    का असे, तसे का, नका विचारू आता 

    तो निघून गेला उत्तर देता देता ॥ 


    हा दोन घडीचा तंबूतिल रे खेळ 

    या विदूषकाला नाही रडाया वेळ 

    लावून मुखवटे नवा खेळ चल लावू 

    ठेवून सावल्या पडद्यामागे जाऊ ॥ 


     अशी विषण्णता किणीकरांच्या काव्यात दिसून येते.

      लेखन हाच किणीकरांचा पिंड, व्यवसाय. किणीकरांनी काही मराठी चित्रपटांच्या कथा, पटकथा संवाद लेखन केलं आहे.१० वर्षे दीपावली या प्रसिद्ध वार्षिकाचे ते संस्थापक, संपादक होते. त्यांचं जीवन थोडं अजबच होतं म्हणायचं. उत्तररात्र पुस्तकाच्या प्रस्तावनेत, त्याला 'कोलाज' असं म्हटलंय, रॉय किणीकर यांच्याविषयी लिहिताना असं म्हटलंय की, त्यांनी लेखक असूनही सरसकट आपली लेखणी राबवली नाही. व्यवहारी जगणे हे तर त्यांच्या स्वभावात नव्हते. रात्री-अपरात्री एस.टी. स्टँडवरच्या झकास वातावरणात ते पुस्तकं वाचीत असत. एस.टी.स्टँडबाबत ते म्हणायचे, "एस.टी.स्टँडसारखी सुंदर जागा नसते. कुठली कुठली किती प्रकारची माणसं येत असतात. आणि कशाकशासाठी कुठंकुठं जात असतात. किती असंख्य प्रकारचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर असतात. आपण आपले कुठल्यातरी एखाद्या बाकड्यावर बसून बघत राहावं. फार काही बघायला मिळतं." 

      भंगड, विचारवंत, मित्र, बाप, नवरा, संपादक, लेखक आणि कलंदर - अशी त्यांची अनेक रुपे होती. 

    रॉय किणीकर यांचं लेखन चिंतनशील आहे. सुरवातीला किणीकरांची, बहुधा त्यांच्याच हस्ताक्षरातली रुबाई बघा.


    हा देह तुझा पण देहातिल तू कोण 

    हा देह तुझा पण देहाविण तू कोण 

    हा देह जन्मतो वाढत जातो सरतो 

    ना जन्म मरण ना देहातिल तो म्हणतो ॥ 

    

    दिसणार कसा भाकरीत लपला देव 

    भाकरी करपली, करपुनि गेला देव 

    मायावी स्वार्थी कृतघ्न आहे धरती 

    एकाला साखर, एकाच्या तोंडी माती ॥ 


    या रुबाया वाचताना, पूर्वी उमरखय्यामच्या रुबाया वाचत असताना, आम्हांलाही काही सुचलेलं तुम्ही वाचाल ? नाही वाचाच. काय आहे की, उद्यापासून पुन्हा एकदा, ' ये रे माझ्या मागल्या अन् ताक कण्या चांगल्या! ' असं झालंय खरं. थोडेथोडके नाही तर चक्क चाळीस दिवस घरी बसून काढलेत. आणि आता अजून १४ दिवस ? कसं व्हायचं देशाचं, आपलं, अश्या काळज्या नका करू. आम्ही म्हणतो, 


  'डोक्यास लावुनी हात कुणी बैसला 

  चिंता करतो विश्वाची या कसला 

  क्षण दोन मिळाले मौज कराया इहलोकी 

  घे आनंद लुटोनी, जाणे कुठे, न कळे कुणाला॥ 


     या लॉकडाऊनमुळे घरच्यांच्या सहवासात किती सुरेख काळ गेला असेल. आता पुन्हा रहाटगाडगं सुरू झालं की कुठे एवढा वेळ मिळणार आहे घरासाठी द्यायला? घरात असल्याने सुरक्षित आहात, ही देवाचीच कृपा समजायची. पण तोपर्यंत आपल्याला काय वाचायचंय त्या त्या आम्ही सुचवलेल्या पुस्तकांच्या यादीत हे रॉय किणीकर लिखित उत्तररात्र हे ही समाविष्ट करा.

    

बेलवलकर गृहनिर्माण

४ मे २०२०

No comments:

Post a Comment