ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद
' हिरोशिमात स्फोटानंतरचं पहिलं घर बांधायची जिद्द सिद्ध केली ती काझुओच्या पंचाहत्तर वर्षांच्या बापानं.
"आम्ही मरणपुरीचा जीवननगरीत कायापालट करू."
काझुओलाही त्यानं चुचकारलं, "असा धीर काय सोडतोस? चल आपण घर बांधायला घेऊ."
दोन घरांच्यामध्ये असलेलं त्यांचं घर पिरगाळलं गेलं होतं. बाप-लेक त्या घराच्या तुळया, खांब घेऊन त्यातलं काय वापरता येईल हे पाहू लागले तेव्हा लोकांना वाटलं, ' वेडे आहेत झालं! ' घराचा पाया झाला, भिंती चढल्या, छप्पर बसलं, तरी त्यांची तशीच संभावना होत होती.स्फोटाच्या बत्तिसाव्या दिवशी त्यांचं घर उभं राहिलं.ते नव्या हिरोशिमातलं प्रथम घर ठरलं!
पहिल्या दिवशी नव्या घरी झोपताना काझुओची धाकटी बहीण कुजबुजली, "दादा बघ, आपल्या छपराला फटी आहेत ना, त्यांतून चांदण्या लुकलुकतायत.".....'
वाचू आनंदे - कुमार गट दोन या माधुरी पुरंदरे संपादित पुस्तकातील धुमारे ही पद्मजा फाटक, माधव नेरुरकर लिखित ही गोष्ट पुन्हा एकदा वाचली. सर्वस्व गमावलेल्या हिरोशिमातल्या या कहाणीनं काय शिकवलं आपल्याला? जपान मधल्या हिरोशिमावर १९४५ मध्ये अमेरिकेने टाकलेल्या अणुबॉम्बमुळे लाखों माणसं तात्काळ मरण पावली, कित्येक नंतर झिजून मेली. या बेचिराख अवस्थेतून जपानी पुन्हा नव्या जिद्दीने, नव्या दमाने उभे राहिले.
' नारळीचे फळ गोमटें । वरी पाहता दिसें करवंटें । भीतरी नेटेपाटें । उत्तम दिसे ॥
कीं कर्दळीफळ पक्वघडी । वरीवरी पाहतां सालडी । भीतरी अमृतरस गोडी । तैसी वाणी मराठी ॥
जे संस्कृताचा गर्व घेती । आणि प्राकृतातें निंदिती । ते गर्विष्ठ अहंकृती । आपस्वार्थी बोलके ॥
जे वरीवरी पाहतां । फळाची करिती उपेक्षिता । ते वंचिती भीतरार्था। अल्पमतीचे जाण पां॥
तैसी उखरवाणी मऱ्हाटी । परी भीतरार्थी घालितां दृष्टी । होइजे सुख संतुष्टी । स्वानुभज्ञान ॥ '
इ.स.१३५८-१४१८ या कालावधीतल्या अज्ञानसिद्ध या कवीने लिहिलेली 'मराठीची महती' या पुस्तकात वाचायला मिळते.
वाचू आनंदे या पुस्तकाच्या पहिल्या भागात ९ ते ११ वयोगटातील मुलांसाठी 'बाल गट-१' आणि १२ ते १५ वयोगटातील मुलांसाठी कुमार गट - २ अशा वाचनयोग्य पुस्तकांच्या निर्मितीत नंदिता वागळे यांनी साहाय्य केलंय.
शिक्षक - पालकांसाठी दोन शब्द या पुस्तकाच्या प्रयोजनाबद्दल बोलताना, ' ही मालिका म्हणजे मराठी साहित्याचा इतिहास नव्हे. मुलांनी जे वाचायला हवे आणि जे त्यांना वाचायला आवडेल असे आम्हांला वाटले अशा साहित्यामधून काही उतारे आणि कविता निवडून या पुस्तकात संग्रहित केलेल्यांना आहेत' असे नमूद करण्यात आले आहे.
पुस्तकात विष्णुशास्त्री चिपळूणकर, ज्योतिबा फुले, ग.दि.माडगूळकर, ग.प्र.प्रधान, सोपानदेव चौधरी राम गणेश गडकरी, वि.दा.सावरकर, वि.वा.शिरवाडकर, प्र.के.अत्रे, संत बहिणाबाई या नामवंतांच्या साहित्यातून निवडक वाचनीय असे उतारे, कविता, नाट्यप्रवेश घेतले आहे.
वर उल्लेखिलेल्या १२ते१५ वयोगटातील मुलांसाठी पुस्तक नक्कीच वाचनीय आहे.
बेलवलकर गृहनिर्माण
२३ एप्रिल २०२०
No comments:
Post a Comment