Sunday, 16 August 2020

पुस्तक परिचय ४०

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


     My Dear Brothers And Sisters ....आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. शिकागोच्या धर्मपरिषदेसाठी भारतातून गेलेल्या स्वामी विवेकानंदांनी साऱ्या अमेरिकनांची मने जिंकली.

      बरेच विषय, वेगवेगळे लेखक, कवी यांच्या कथा, कविता असं शक्य तितकं बहुढंगी बहुरंगी  साहित्य गेल्या ३८ दिवसांत वाचकांस आम्ही सुचवीत आहोत. नवीन कोणता विषय किंवा लेखक आजच्या दिवसासाठी निश्चित करावा, यासाठी पुस्तककपाटात पाहता पाहता दोन पुस्तकं नजरेत भरली. एक दोन अडीचशे पानांचं आणि दुसरं  छप्पन पानांचं! आणि आठवले हे  शालेय जीवनापासून ऐकलेले दिव्य शब्द.

      स्वामी विवेकानंद यांचेविषयी आपल्या सर्वांना अतिशय आदर आणि अभिमानही आहे. याहून  अधिक आपल्याला स्वामीजींच्या विचारांविषयी काय माहीत आहे, असा प्रश्न जेव्हा स्वतःला विचारला तेव्हा स्वतःबद्दल थोडीशी नाराजीच वाटली. हातातली दोन्ही पुस्तकंसुद्धा अद्याप वाचायची राहून गेल्याची खंत वाटली. 'ज्ञानयोग' पुस्तक आजच्या आज वाचून त्यावर काही लिहिणं एवढी आपली पात्रता नसल्याची जाणीव झाली. दुसरं *ज्ञानमार्गावरील प्रवचने* लगेचच वाचून काढणे शक्य असल्याने बसल्या बैठकीत वाचून पूर्ण केले.

      स्वामीजी अमेरिकेत असताना त्यांची ज्ञानमार्गावर झालेली प्रवचने त्यांच्या शिष्या कुमारी एस्.ई.वॉल्डो यांनी ती लिहून घेतली होती. स्वामीजींचे गुरुबंधू स्वामी सारदानंद जेव्हा इ.स. १८९६ मध्ये प्रचारकार्यासाठी अमेरिकेत गेले होते तेव्हा त्यांनी वॉल्डो यांच्या वहीतून ही प्रवचने लिहून घेतली होती. तोच नऊ प्रवचनांचा संग्रह.

     वाचताना आवडलेल्या, भावलेल्या, पुनःपुन्हा वाचायला हव्या अशा वाक्य-परिच्छेदांवर खुणा करण्याची सवय. बहुतेक सर्वच पानांवर असंख्य खुणा झाल्या. कोणत्या निवडून वाचकांना सांगायच्या ही मोठीच समस्या झाली. तरी एखाददोन वाक्ये किंवा परिच्छेद इथं घेण्याचा मोह आवरेना.

      ' नि:स्वार्थ भावाचा अर्थ निकृष्ट किंवा भासमान 'अहं 'चा त्याग करणे हा आहे.' 

      ' मनच आपल्यापुढे शरीर, लिंगभेद, संप्रदाय, जाति, बंधन इत्यादी भ्रम उपस्थित करीत असते.म्हणून मनाला सत्याचा साक्षात्कार होईपर्यंत त्याला सतत सत्य सांगत राहिले पाहिजे. आपले सत्यस्वरूप हे आनंदमय आहे.' 

     ' मानवी जीवनाची दोन उद्दिष्टे किंवा लक्ष्ये आहेत - खरे ज्ञान किंवा विज्ञान आणि आनंद.

     ' आर्यांच्या दृष्टीने धर्मात स्त्रीपुरुषभेदाला स्थान नाही.वेदांमध्ये व उपनिषदांमध्ये आपल्याला असे दिसून येते की स्त्रिया सर्वश्रेष्ठ सत्यांचा उपदेश करीत व पुरुषांप्रमाणे त्यांनाही मान दिला जाई.'  

     असं बरंचसं वाचायला देता आलं असतं. पण ते जवळपास पुस्तकाइतकंच झालं असतं.

      हे पुस्तक वाचा म्हणून सांगावंसं वाटलं तर ते प्रत्येकाने वाचायलाच हवं म्हणून.

     कधी एकटेपण माणसाला छळतं, तर कधी विचार नैराश्याकडे झुकू लागतात. अगतिकता त्रास देते. अशावेळी अंतर्मुख होऊन विवेकानंदांसारख्या थोर तत्वज्ञानी व्यक्तीचे सहज सुंदर विचार आपल्यातलं चैतन्य फुलवतात. मनाला आलेली मरगळ त्यांच्या साध्या साध्या वाक्यांतल्या संदेशांनी दूर होते. अगदी सहजच आपण अंतर्मुख होतो. आपणच आपले मार्ग शोधून काढतो. समस्यांवर मात तरी करतो, नाहीतर परिस्थितीचा स्वीकार करून सामोरे जातो. 

     आम्ही काही तत्वज्ञ नाही. पण तुम्हीही हे पुस्तक जरूर वाचावं. आज ना उद्या मार्ग दाखवण्याइतके समर्थ विचार या पुस्तकात आहेत अशी आमची पक्की खात्री आहे.

      

बेलवलकर गृहनिर्माण

५ मे २०२०

No comments:

Post a Comment