Thursday, 20 August 2020

पुस्तक परिचय ४४

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


      गेल्या शेसव्वाशे वर्षांत मराठी  साहित्यातील असंख्य पुस्तके प्रकाशित झाली. काही पुस्तकांच्या नशिबी एकच आवृत्ती होती तर काही पुस्तकांवर वाचकांच्या एवढ्या उड्या पडल्या की त्या पुस्तकांच्या अनेको आवृत्ती काढाव्या लागल्या. 

      एखाद्या ग्रंथालयात गेल्यावर वाचनसंस्कृतीत नव्याने पदार्पण करणाऱ्याला, विशेषतः नव्या पिढीतल्या उमद्या, चिकित्सक वृत्तीच्या वाचकाला, नेमकं कोणतं पुस्तक वाचावं असा प्रश्न पडू शकतो. १६-१७ वर्षांपूर्वीपासून ऐसी अक्षरेच्या माध्यमातून आम्ही सुरेख, सुंदर, उद्बोधक असे साहित्य नेमके निवडून वाचकांस देण्याचा प्रयत्न करीत आहोत.

      सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात ऐसी अक्षरेच्या एका वेगळ्याच विषयावरील विशेषांकाचे प्रकाशन लांबणीवर पडले आहे. मात्र वाचकांस या लॉकडाऊन नंतर कोणती पुस्तके आवर्जून वाचायला हवीत याविषयी २८ मार्च पासून रोज आम्ही एका नव्या पुस्तकाची ओळख करून देत आहोत. समीक्षणात्मक ओळख करून न देता त्या पुस्तकातली काही उत्तम वाक्ये, प्रसंगांची थोडक्यात माहिती देऊन, काव्य संग्रह असेल तर काही कवितांतील एखादे कडवे लिहून पुस्तकाची ओळख आम्ही करून देत आहोत.

     आज जो काव्यसंग्रह,  वाचनात विशेष गोडी असलेल्या, काव्यप्रेमी आणि चिकित्सक वृत्तीच्या वाचकांसाठी सुचवू इच्छित आहोत, त्याचं नाव आहे, 

बाळ सीताराम मर्ढेकरांची कविता

     मराठी साहित्यात विशेष रुची असणाऱ्या, अभ्यासू वृत्तीच्या वाचकांना मर्ढेकर या मोठया कवीची नक्की ओळख असेल. मर्ढेकर म्हटलं की त्यांच्या त्या कवितेची पहिली ओळ तात्काळ आठवते. ' पिपांत मेले ओल्या उंदीर; ...' कविता पूर्ण वाचली की त्यातील किड्यामकोड्यासारखे जीवन जगणाऱ्यांची व्यथा कळते.

  'पिपांत मेले ओल्या उंदीर;

   माना पडल्या, मुरगळल्याविण;

    ओठांवरती ओठ मिळाले;

    माना पडल्या, आसक्तीविण.

 गरिब बिचारे बिळांत जगले, 

 पिपांत मेले उचकी देऊन;

       दिवस सांडला घाऱ्या डोळी 

       गात्रलिंग अन् धुऊन घेउन.

   जगायची पण सक्ती आहे;

   मरायची पण सक्ती आहे.

उदासतेला जहरी डोळे, 

काचेचे पण; 

                         मधाळ पोळे 

             ओठांवरती जमले तेही 

             बेकलाइटी, बेकलाइटी ! 

        ओठांवरती ओठ लागले ;

        पिपांत उंदिर न्हाले ! न्हाले !'

                   *बा. सी. मर्ढेकर* 


   काही कविता समजत नाहीत, दुर्बोध वाटतात. अशा कविता जरा एकाहून अधिकवेळा वाचल्या तर त्यातील अर्थ उमगू लागतो. 

    या पुस्तकाच्या शेवटी शेवटी मर्ढेकर म्हणतात, 

    " शब्दांवर थोडी हुकमत असली आणि लय तोंडवळणी पडली म्हणजे लिहिणं फारसं कठीण नसतं.त्यापलीकडे काही पुढील लिखाणात आहे किंवा नाही हे वाचकच ठरविणार. त्यांचं मत अनुकूल पडलं नाही तर लेखकानं योग्य तो बोध घ्यावा. पण ' भूमिके ' चा टोप चढवून आणि तळटीपांचे पैंजण घालून नकटीला शारदेचं सोंग घ्यायला लावणं हा त्यावर तोडगा खास नाही."

     या कोरोनाच्या निमित्ताने थोडंसं अंतर्मुख होऊन चिंतन केलं तर लक्षात येतं की, माणूस लहान असो वा मोठा, गरीब असो वा श्रीमंत, काळा वा गोरा, प्रगत देशातील असो वा मागास देशातील, अमेरिकन-युरोपियन पाश्चात्य असो आफ्रिकन- आशियाई असो, 'इस कोरोनाने किसीको भी नहीं छोडा...' मर्ढेकरांची यातील एक मोठी कविता वाचताना लक्षात येतं..., 

   ' मी एक मुंगी, हा एक मुंगी, 

     तो एक मुंगी, तू एक मुंगी, 

     ही एक मुंगी, ती एक मुंगी,            

     पांच एथल्या, पांच फिरंगी ....


     अशा एथल्या संसारांत

     जगण्याचाही चुकला पाढा;

     आणि शेवटी परिस्थितीचा 

     गळ्या खालती उतरे काढा.' 

कवितेच्या शेवटी मर्ढेकर लिहितात ...

' --सर्वे जन्तु रुटिना:। सर्वे जन्तु निराशया:।सर्वे छिद्राणि पंचन्तु। मा कश्चित् दु:ख-लॉग् भरेत्॥ ' 


या कवितेच्या निर्मितीच्या वेळी असलेली सामाजिक परिस्थिती पाहून मर्ढेकरांनी ही कविता लिहिली असेल. 


     आपण मात्र सारेच सध्याच्या संकट काळात आशावादी राहून पुनःपुन्हा म्हणू या,


"सर्वेsपि सुखिनः सन्तु।

    सर्वे सन्तु निरामया:। 

      सर्वे भद्राणि पश्यन्तु। 

        मा कश्चिद् दु:खमाप्नुयात ॥"


बेलवलकर गृहनिर्माण

९ मे २०२०

No comments:

Post a Comment