ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद
' इतर दासदासींपेक्षा तिला महाराणीबद्दल वेगळंच काही माहीत आहे. मंजिरी स्वतःच्या अशा भावनेच्या कोषात शिरली की स्वप्नात असल्यासारखी दिसायची. मंद, झोपाळू हसू तिच्या चेहऱ्यावर असायचं. महाराणीचे केस आणि ती- यापलीकडचं मग काहीच तिला महत्वाचं नसायचं. पहिल्या दिवशी ते मोकळे भरपूर केस तिनं जेव्हा हातात घेतले, तेव्हा ती अगदी सळसळून गेली. नुकती न्हालेली, ताज्या त्वचेची, अगदी अनलंकृत अशी एक प्रौढ स्त्री. तिचे सावळे उघडे खांदे, मोकळी उंच मान, पाठीची खोल पन्हळ आणि कमरेच्या वस्त्रापर्यंत पसरुन रुळणारे ते सुगंधी काळेभोर केस. मंजिरी आपल्या स्वामिनीच्या तशा पाठमोऱ्या अस्तित्वावर लोभावून गेली. त्या केसांच्या स्पर्शानं सुखावली....'
महाराणी द्रौपदीच्या प्रौढ वयातल्या केसांचं हे मोहक वर्णन वाचताना समोर प्रकट होऊ पाहतं ते द्रौपदीच्या तारुण्यातलं विलोभनीय रुप!
एखाद्या विलक्षण स्त्रीच्या उतार वयातल्या सौंदर्याचं असंही वर्णन होऊ शकतं?
हे सामर्थ्य असतं त्या समर्थ लेखणीचं.
-----
' होय रे श्रीरंगा, मी अजून खेळते जुने खेळ. लहानपणचे सगळे खेळ म्हातारपणी पुन्हा खेळावेसे वाटतात बघ. मी अजून कधी तरी सूर्य बुडाल्यावर जाते यमुनेवर. पाणी आणायचं नसतं आता. नुसतीच जाते. कदंबाखाली बसते थोडा वेळ. डोळे मिटले तिथे बसून, की वाटतं, कुठून तरी सख्यांचा आवाज येईल ' साई सुट्ट्यो ' म्हणून. मग मी उठेन.त्यांना शोधत जाईन इकडे तिकडे आणि अचानक एखाद्या झाडामागून तूच पकडशील माझा हात, ओढून घेशील आणि नेशील तिकडे वेळूंमध्ये. सख्या वेड्या लपलेल्या तशाच. माझी चाहूल घेत...'
' राधेs' कृष्णानं अतिकोवळेपणानं तिच्या गालाला स्पर्श केला.
' मला कळतं रे की, असे भास होणं बरं नव्हे. पण कधी कधी वाटतं की, अशा भासांच्या खेळात तेवढी मी खरीखुरी जगते. तिथल्या तेवढ्या आनंदावर इतर सगळं तरून जातं. तुला नाही रे कधी असं होत? '
उतार वयातली तारुण्यातल्या आठवणीत रमलेली राधा डोळ्यांसमोर आणायची. तिच्या ह्या आठवणीतून हळुवार बाहेर काढत उतारवयातल्या या दुराव्याच्या व्यथा जाणून घ्यायच्या आणि नेमक्या शब्दांत मांडायच्या. प्रतिभेबरहुकूम लेखणीला लिहितं करायचं ही तर सिद्धहस्त साहित्यिकाची हातोटी!
------
" माझ्या मनाला शांती कधी मिळेल हो ? तडफड संपेल कधी ? " कुंती सौम्य हसली. ओंजळीत तोंड लपवून गदगदणारी द्रौपदी तिनं त्यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. अन् तशी तिची कल्पनाही केली नव्हती. पण तिला तिच्या रडण्याचं नवल वाटलं नाही. समजुतीच्या स्वरात ती म्हणाली,
"शांतीचं दुसरं नाव बाईच्या लेखी बरेचदा ' समर्पण ' असतं, हे तुला माहीत आहे ? मागचा-पुढचा विचार न करता कशावर तरी ओवाळून टाकायचं स्वतःला, आणि तृप्त होऊन संपूनच जायचं. तू अशी संपणारी नाहीस. सरळपणे कशाचाच स्वीकार स्वतःला संपवत केला नाहीस तू. तुला तुझं स्वत्व राखणं ही गोष्ट फार थोर आहे बये, पण कायमची अशांत ठेवणारी आहे. तुझी सुटका नाही तडफडण्यातून."
------
द्रौपदी, राधा, कुंती या तीन महाभारतकालीन स्त्रियांच्या तीन व्यथा-कहाण्या, अतिशय संयमी भाषेत येतात, डॉ.अरुणा ढेरे यांच्या कृष्णकिनारा या पुस्तकात.
ऐसी अक्षरेसाठी गेल्या दीड दशकांहून अधिक काळ अभिमानास्पद अशा अनेक आठवणींनी भरून गेलाय आणि हा उपक्रम आपल्याच नादात बहरून आलाय. याचं कारण म्हणजे अनेक सिद्धहस्त साहित्यिकांची विविध निमित्ताने उपस्थिती, सहभाग आणि त्यांच्या साहित्याची प्रेरणा.
डॉ.अरुणा ढेरे आणि ऐसी अक्षरे यांचे नाते असेच, अगदी जिव्हाळ्याचे.
२०१९ च्या जानेवारीत यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.अरुणा ढेरे यांची एकमताने निवड झाली. या निमित्ताने आम्ही ऐसी अक्षरेचा डॉ.अरुणा रामचंद्र ढेरे गौरव विशेषांक एका देखण्या सोहळ्यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित केला होता. त्यावेळी अरुणाताईंच्या विनम्रतेचं दर्शन झालं आणि 'विद्वान सर्वत्र पूज्यते' या उक्तीचा अनुभव आला.
लॉकडाऊन-३मुळे वैतागून गेलेल्या आपणा सर्वांनाच अरुणाताईंचं, त्यांच्या 'अर्ध्यावाटेवर' कथासंग्रहातल्या ह्या उताऱ्यातलं हे स्वप्न नवी प्रेरणा देईल.
" मला वाटतं, आपल्या सगळ्यांनाच दूर क्षितिजावर कुठेतरी एक स्वप्न दिसत असतं. त्याचा वेध घेऊन आपण पुढे पुढे जात असतो. असं दूरस्थ स्वप्न आपल्याला हुरहूर लावतं. अस्वस्थ, असमाधानी ठेवतं, पण तेच आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा देत असतं. त्या स्वप्नासाठीच रोज सकाळी आपण झोपेतून जागे होतो. निदान मी तरी तशी होते. रोज सकाळी मला जाग येते ती याच विचारानं, की अजूनही काहीतरी अनपेक्षित, अभूतपूर्व, सुंदर, अद्भुत घडणार आहे. लवकरच, कदाचित आजदेखील!"
बेलवलकर गृहनिर्माण
११ मे २०२०
No comments:
Post a Comment